पुणे : राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर कमी होत असून फक्त कोकण व मध्य महाराष्ट्रात त्याचा जोर राहील. 7 ऑक्टोबरपर्यंत असे वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. आठ दिवस राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र 2 ते 7 ऑक्टोबर या पाच दिवसांत राज्यातून पाऊस कमी होत आहे. कोकणात 7 ऑक्टोबरपर्यंत, मध्यम मराठवाड्यात 4, तर विदर्भात 3 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज आहे. सोमवारपासून राज्यातील सर्व अलर्ट कमी होत असून मुसळधार ते अतिमुसळधार पडणारा पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
पुण्यात पाचव्या दिवशी पावसाची बॅटिंग
शहरात रविवारीही सलग पाचव्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सुटीच्या दिवशीदेखील जनजीवन विस्कळीत झाले. सर्वच रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले होते. दिवसभरात शहरात 4.4 मिमी पावसाची नोंद झाली, तर 24 तासांत 12 मिमी पावसाची नोंद झाली. रविवारचा दिवस असल्याने अनेकांनी सकाळीच बाहेर पडणे पसंत केले.
मात्र, सकाळी 11 नंतर पावसाने दाणादाण उडवून दिली.