Khadakwasla Dam News : ‘खडकवासला’ साखळी प्रकल्पातून विसर्ग | पुढारी

Khadakwasla Dam News : ‘खडकवासला’ साखळी प्रकल्पातून विसर्ग

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोटक्षेत्रात पावसाने हजेरी लावली. वरसगाव आणि पानशेत ही धरणे 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. वरसगाव धरणातून शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून 1794 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. सध्या चारही धरणांमध्ये मिळून 95 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे.

त्यामुळे पाणीसाठा 27.74 अब्ज घनफूट (टीएमसी) आहे. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत टेमघर धरणक्षेत्रात 15 मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात सहा मिमी, पानशेत धरणक्षेत्रात आठ मिमी, तर खडकवासला धरणक्षेत्रात 27 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने पानशेत धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग दुपारी दोन वाजता बंद करण्यात आला. या धरणातून केवळ विजेच्या निर्मितीसाठी 600 क्युसेकने पाणी सोडण्यात आले.

खडकवासला धरणातून नवीन मुठा उजवा कालव्यात 1054 क्युसेकने पाणी सोडण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. सध्या टेमघर धरणात 2.83 टीएमसी (76.37 टक्के) आणि पावसाने दडी मारल्याने 45 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा कमी झालेल्या खडकवासला धरणात सध्या 1.44 टीएमसी (72.83 टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे. पानशेत, वरसगाव धरणांमधून सुरू असलेला विसर्ग आणि धरणांच्या परिसरात सुरू असलेला पाऊस, यामुळे खडकवासला हे धरण पुन्हा पूर्णक्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे, असेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

खडकवासला साखळी प्रकल्पातून इंदापूर, दौंड आणि हवेली या तालुक्यांना मुठा उजवा कालव्यातून पाणी देण्यात येत आहे. गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून पाणी सुरूच आहे. सध्या जानाई-शिरसाईसह काही तलाव भरण्यात येत आहेत. ही बाब लक्षात घेता 15 ऑक्टोबरपर्यंत हे पाणी सुरूच राहील.

– श्वेता कुर्‍हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला साखळी प्रकल्प

Back to top button