दुष्काळी स्थितीमुळे पुणे जिल्हा पोलिसांचे ‘टेन्शन’ वाढले

दुष्काळी स्थितीमुळे पुणे जिल्हा पोलिसांचे ‘टेन्शन’ वाढले
Published on
Updated on

यवत : ऑगस्ट महिना संपला तरी धरणक्षेत्र वगळता संपूर्ण जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकरीवर्ग संकटात आला असताना, अशातच जिल्हा पोलिस दलाचेदेखील 'टेन्शन' वाढले असल्याचे पाहायला मिळत आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाने दडी मारली असल्याने संपूर्ण जिल्ह्यात चोर्‍यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे, त्यामुळे पोलिसांचीदेखील डोकेदुखी वाढली आहे. दुष्काळी परिस्थितीचा फटका शेतकरीवर्गाला ज्या पद्धतीने बसत आहे, त्याच पद्धतीने पोलिस दलदेखील 'टेन्शन'मध्ये आले आहे.

गेल्या महिनाभरात ग्रामीण भागातील जवळपास सर्वच पोलिस स्टेशनमध्ये दिवसभरात किंवा दिवसाआड घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल होत असून, यात भुरट्या चोर्‍यांसह मोठ्या रकमेच्या चोर्‍या होत असल्याचे दिसून येत आहे. पाऊस पडला नसल्याने सर्वच भागांतील मजुरांना काम मिळत नाही, त्यामुळे रोजचा खर्च कसा भागवावा या चिंतेत असणारे काही लोक चोर्‍या करण्याचा निर्णय घेतात. तसेच चोर्‍या करण्याचे काम सोडून मोलमजुरी करणारे काही लोकदेखील काम मिळाले नाही तर नाइलाजाने दुष्काळी परिस्थितीमुळे चोरी करण्याकडे वळतात आणि चोर्‍याचे प्रमाण वाढते असे साधारणपणे दिसते.

गेल्या काही दिवसांत झालेल्या चोर्‍या उघडकीस आणण्यातदेखील पोलिसांना यश आले आहे हे नाकारून चालणार नाही. पावसाळी हंगामात समाधानकारक पाऊस झाला, तर या घटनांना काही प्रमाणात आळा बसतो, असे ज्येष्ठ व्यक्ती व अधिकारी आवर्जून सांगतात. त्यामुळे वरुणराजा रुसून बसल्याचा फटका शेतकरीवर्गाइतकाच पोलिस दलालादेखील बसला असून, चोरीच्या घटना वाढीस लागल्या असल्याने बर्‍याच कर्मचारी आणि अधिकारी वर्गाच्या सुट्या रद्द केल्या जात आहेत. प्रभारी अधिकारी यांनादेखील साप्ताहिक सुटी घेण्याऐवजी तपास करा असे सांगितले जात आहे. चोरीच्या वाढत्या घटना पाहता, गणपती उत्सव काळातदेखील पावसाने ओढ दिली तर पोलिस दल मात्र पुरते हवालदिल होऊन जाईल यात शंका नाही.

अधीक्षकांच्या सक्त सूचना
गेल्या दोन ते तीन महिन्यांत जिल्ह्यात वाढलेल्या चोर्‍यांचे प्रमाण पाहता, पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी प्रत्येक पोलिस स्टेशन हद्दीत नाकाबंदी करणे, रात्रीच्या वेळी गस्त वाढवणे अशा सूचना दिल्या असल्याने काही प्रमाणात चोर्‍यांना आळा बसला असला तरी चोरीच्या घटना पूर्णपणे बंद झालेल्या नाहीत.

गेल्या काही दिवसांत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चोरीच्या घटना घडल्या होत्या, त्यातील बरेच गुन्हे स्थानिक पोलिस स्टेशन आणि जिल्हा पोलिस दलाची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी एकत्रितपणे उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पुढील काळातदेखील चोरीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार कामकाज सुरू आहे.
                                  अविनाश शिळीमकर निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news