पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात मान्सून पावसाने उशिराने हजेरी लावल्यामुळे हळवी कांद्यांचे सरासरी सुमारे एक लाख हेक्टरहून अधिक असलेले क्षेत्र यंदाच्या खरिपात पन्नास टक्क्यांनी घटून 46 हजार हेक्टर इतकेच झाले आहे, तर कांद्याचे उत्पादन 6 लाख 5 हजार टनाइतका होण्याचा कृषी विभागाच्या फलोत्पादन संचालनालयाचा प्राथमिक अंदाज आहे. गतवर्षाशी तुलनाकरिता उत्पादनात सरासरी सुमारे दोन लाख टनांनी घट येईल, असे चित्र निर्माण झाले आहे.
लेट खरीप हंगामातील कांदा लागवडीची माहिती अद्यापही उपलब्ध झालेली नाही. पावसाअभावी लेट खरीप कांदा लागवडीसही अडचणी आलेल्या असून, लागवड झालेल्या कांद्याला सध्या दडी मारलेल्या पावसामुळे फटका बसण्याची शक्यता असल्याने एकूणच कांदा पीकही अडचणीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस कांदा तेजीतच राहील, असा अंदाज घाऊक बाजारपेठेतून वर्तविण्यात येत आहे. राज्यात सरासरी तीन हंगामात मिळून कांद्याचे सरासरी 110 लाख मेट्रिक टनापासून ते 136 लाख मेट्रिक टनाइतके उत्पादन अलीकडील चार वर्षांत झालेले आहे.
त्यामध्ये लेट खरीप आणि रब्बी हंगामात प्रामुख्याने सर्वाधिक उत्पादन हाती येते. चालूवर्षी मान्सनूचा पाऊस उशिराने सुरू झाल्याने कांदा लागवडी विलंबाने झाल्या आहेत. तर पावसामध्ये सातत्य नसल्यानेही पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या खरिपात (खरीप 2022) राज्यात कांद्याची 90 हजार हेक्टरवर लागवड झाली होती. ती चालू वर्षीच्या खरिपात सद्यस्थितीत राज्यात 46 हजार हेक्टरवरच कांदा लागवड झाली असून, सुमारे 6 लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन अपेक्षित असल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून दिसून येत आहे. गतवर्षापेक्षा लागवड क्षेत्र पन्नास टक्क्यांनी घटल्याचे दिसून येत आहे.
नवीन हळवी कांद्याची आवक बाजारात 15 सप्टेबरनंतर तुरळक प्रमाणात होत असते. चालू वर्षी ही आवक किमान दीड महिना उशिराने म्हणजे ऑक्टोबर महिनाअखेर सुरू होण्याचा अंदाज आहे. पुढील दोन महिने कांदा दर तेजीत राहण्याची शक्यता आहे.
– विलास भुजबळ, कांद्याचे अडते, पुणे मार्केट यार्ड.