

कडूस : पुढारी वृत्तसेवा : खेडसह शिरूर तालुक्याला वरदान ठरलेले ८.५३ तीएमसी क्षमता असलेल्या चासकमान धरणात ९५.६४ टक्के म्हणजेच एकूण ८.२० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यामध्ये उपयुक्त ७.६४ टिएमसी पाणी साठा असून धरणाच्या पाचपैकी तिन दरवाजे बंद करण्यात आले. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात विशेषतः धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत मागील २४ तासांत १ मिलिमिटर तर १ जूनपासून एकूण ३२२ मिलिमिटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
मागील तिन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या आरळा नदी बरोबरच भीमा नदीमधून धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग मंदावला. त्यामुळे चासकमान धरणामध्ये होणारी पाण्याची आवक थंडावली आहे. पर्यायाने धरणाचे पाचपैकी तिन दरवाजे बंद करण्यात आले असून दोन दरवाजे उघडे असल्याने धरणाच्या सांडव्याद्वारे भीमा नदी पात्रात १०७० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे ५०० तर कालव्याद्वारे नदी पात्रात ३५० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. म्हणजेच एकूण १९२० क्युसेक विसर्ग सूरु आहे.
दि. २८ जुलै रोजी चासकमान धरण ९३.२१ टक्के भरल्याने खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गहीत धरून धरणाचे पाचही दरवाजे २० सेंटिमिटरने उघडून ३४९० क्युसेक वेगाने भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली होती. गेली दोन दिवस पावसाने पाणलोट क्षेत्रात विश्रांती घेतल्यामुळे विसर्ग कमी करावा लागला असून आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार धरणात येणाऱ्या पाण्यानुसार विसर्ग पुन्हा कमी-जास्त करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :