लोणी : पुढारी वृत्तसेवा : इर्शाळवाडीतील घटना अतिशय दुर्दैवी आहे. या आपत्तीग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. या संकटात पशुधन दगावलेल्या पशु पालकांना मदत करण्यास शासन कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पशुसंवर्धन अधिकार्यांना याबाबत सर्वतोपरी सुचना केल्या आहे. आपत्तीमध्ये दगावलेल्या जनावरांची संख्या समल्यानंतर पशु पालकांना कोणत्या प्रकारची मदत करता येईल, याचा विचार शासन निश्चित करेल.
लम्पी संकटात केलेल्या मदतीप्रमाणेच नैसर्गिक संकटात सरकार पशु पालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. नगर, सोलापूर, खांदेश भागात पावसाचे प्रमाण अतिशय कमी असून. पाऊस व्हावा अशी अपेक्षा सर्वांची आहे. पहिली पेरणी वाया गेली असली तरी, दुबार पेरणीसाठी शेतकर्यांना मदत करण्याच्या दृष्टीने सरकारचे नियोजन असल्याचे स्पष्ट करुन, बोगस बियाणे व खतांचे लिंकेज बाबत येणार्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेवून यामध्ये प्रचलित कायद्यात बदल करण्याच्या दृष्टीने शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आल्याचे ते म्हणाले. दरम्यान, भाजप उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी विठ्ठलराव लंघे यांच्या निवडीबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी त्यांचा सत्कार करुन अभिनंदन केले.
उप मुख्यमंत्री अजित पवारांमुळे निर्णयांना गती..!
उप मुख्यमंत्रीपदी अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्याने सरकारच्या निर्णय प्रक्रियेला अधिक गती प्राप्त झाली. मागील अडीच वर्षांमध्ये ठप्प झालेली विकास प्रक्रीया अधिक वेगाने पुढे जाण्यास मदत झाली आहे. आमचा संसार आता उत्तम चालल्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.