पिंपरी : पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ कायम | पुढारी

पिंपरी : पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ कायम

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने पवना धरणाच्या पाणी साठ्यात सातत्याने वाढ होत आहे. तसेच, पवना नदीचे पात्र भरून वेगात वाहत आहेत. ही मावळ तालुका आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी समाधानाची बाब आहे. कडक उन्हामुळे वाढलेली पाण्याची मागणी, तसेच, बाष्फिभवनामुळे पवना धरणाचा पाणीसाठा केवळ 16 टक्क्यांपर्यंत पोहचला होता. पावसाने उशीरा हजेरी लावली. जून महिन्याच्या अखेरीपासून थांबत थांबत पाऊस सुरू झाला. तेव्हापासून ओढे, नाले, धबधबे व झरे वाहत आहेत. त्यामुळे धरणात हळूहळू पाणीसाठा वाढू लागला.

पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणार्या पवना धरण क्षेत्रात जुलै महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावली. संततधार कायम असल्याने धरणात पाण्याचा साठा वेगात वाढत आहे. गुरूवारी (दि.20) धरण निम्मे म्हणजे 50 टक्के भरले. त्यामुळे शेतकर्यांसह नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

पाऊस कायम असल्याने धरणात पाणी साठा वाढीचे प्रमाण कायम आहे. रविवारी (दि.23) सकाळी सहापर्यंत धरणात 57 टक्के पाणी साठा होता. तर, सायंकाळपर्यंत हा साठा 58 टक्क्यांच्यावर पोहचल्या होता. गेल्या 24 तास 65 मिलिमीटर पाऊसाचे नोंद झाली आहे. तर, आतापर्यंत एकूण 1236 मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर, पावसाची संततधार कायम राहिल्यास 15 ऑगस्टपर्यंत धरण 100 टक्के भरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या वर्षी याच दिवशी पवना धरणात एकूण 74.24 टक्के इतका पाणी साठा होता. तर, एकूण 2809 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 16 टक्के कमी पाणी साठा धरणात आहे.

Back to top button