आपत्ती काळात तत्काळ प्रतिसाद द्या : चंद्रकांत पाटलांचे पुणे जिल्हा प्रशासनाला निर्देश | पुढारी

आपत्ती काळात तत्काळ प्रतिसाद द्या : चंद्रकांत पाटलांचे पुणे जिल्हा प्रशासनाला निर्देश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व दरडप्रवण गावांना भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती घ्यावी. पावसाळ्यात कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीला तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा तयार ठेवावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

पाटील यांनी शनिवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या तयारीबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी चर्चा केली. त्यांनी जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती, धरणातील पाण्याची स्थिती, दरडप्रवण आणि पूरप्रवण गावांची माहिती घेतली.
तालुका पातळीवर प्रत्येक आठवड्यात दरडप्रवण गावांना भेट देण्यात याव्यात. या गावांमध्ये धोक्याच्या ठिकाणी राहणार्‍या नागरिकांना पावसाळ्यात सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे.

नागरिकांना आपत्तीच्या वेळी घ्यावयाच्या दक्षतेबाबत माहिती द्यावी. दरडी पडण्याचा धोका असलेल्या भागात पावसावेळी वाहतुकीसाठी रस्ते बंद ठेवावेत. आपत्तीच्या वेळी प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक साधने आणि मनुष्यबळाचे नियोजन तयार ठेवावे. विशेषत: दरडप्रवण क्षेत्रात तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक यंत्रणा तयार ठेवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाबाबत करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली. तालुका स्तरावर पथके तयार करून दरडप्रवण गावातील परिस्थितीची माहिती घेण्यात आली. आपत्तीच्यावेळी नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी जवळची सुरक्षित निवार्‍याची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. दरडप्रवण
गावांबाबत तालुका स्तरावरील नियंत्रण कक्षाद्वारे माहिती घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

पुण्यातील खडकवासला धरणसाखळीत पन्नास टक्के पाणीसाठा

पुणे : महापालिकेचा दंड ऑनलाईन भरा

रायगड-पुणे रस्त्यावर मुरूम टाकून वरंधा घाट बंद; प्रशासनाकडून आदेश

Back to top button