वेल्हे (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही पानशेत रस्त्यावरील सोनापूर येथील पुलाच्या कामाला मुहूर्त मिळालेला नाही. त्यातच दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पुलासह रस्ता खचू लागला आहे. जोरदार पावसात रस्ता वाहून गेल्यास पानशेत-वरसगाव भागाचा संपर्क तुटण्याची भीती आहे. एका बाजूला खडकवासला धरण व दुसर्या बाजूला डोंगर असल्याने पर्यायी रस्ता तयार करण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खचलेला पूल व रस्त्याचे मजबुतीकरण करून एकेरी वाहतूक सुरू केली आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार म्हणाले की, खडकवासला धरणातील पाण्याच्या लाटा रस्त्याला धडकत आहेत. तेथे पूल व लगतचा रस्ता खचत आहे. त्यामुळे तांत्रिक बाबींची पूर्तता करून काम केले जाणार आहे. जुलै महिनाअखेरीस पुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे. पाऊस सुरू झाल्यापासून चारवेळा वरिष्ठांसह रस्त्याची पाहणी केली आहे. सुरक्षेसाठी रेलिंग लावण्यात आले आहे. काँग्रेसच्या सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष लहूअण्णा निवंगुणे म्हणाले की, पूल खचल्याने नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. पर्यटकांची संख्या वाढल्याने वाहतूक वाढली आहे. रात्री दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. आमदार भीमराव तापकीर म्हणाले की, अनेक वर्षांपासून या ठिकाणी पूल, रस्ता खचत आहे. त्यामुळे मलमपट्टी न करता कायमस्वरूपी टिकेल असा पूल उभारण्यासाठी शासनाकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.