वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने दुधाचा किमान दर 34 रुपये निश्चित केला आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या दुधाला आता चांगला भाव मिळेल, अशी चर्चा नोकरदारवर्गात सुरू आहे. शेतकर्यांनी मात्र, याबाबत असमाधान व्यक्त करीत दुधाला किमान 39 ते 41 रुपयाचा दर मिळायला पाहिजे असे म्हटले आहे. हा दर आम्हाला परवडत नसल्याचे दूध उत्पादक शेतकर्यांनी सांगितले.
दुधाचा उत्पादन खर्च सध्या सरासरी एका लिटरला 37 ते 40 रुपयांपर्यंत जातो. त्यामुळे सध्या मिळणारा दर हा अपुरा असल्याचे शेतकर्यांकडून सांगण्यात येत आहे. सरकारने किमान दर निश्चित करताना 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ असेल, तरच हा दर मिळणार आहे. त्याच्यापेक्षा कमी फॅट असलेल्या दुधाला प्रत्येक पॉईंटला 50 पैसे कमी असा दर मिळणार आहे. मात्र, यामुळे शेतकर्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे 3.5 फॅट व 8.0 एसएनएफ असलेल्या दुधाला किमान 39 ते 41 रुपये भाव मिळावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी करत आहेत. शासनाने अगोदर पशुखाद्याचे दर कमी करावेत व दूध दरात किमान 6 ते 7 रुपये प्रतिलिटर वाढ करावी, अशी मागणी दूध उत्पादक शेतकर्यांकडून होत आहे.
मागील काही महिन्यांपासून पशुखाद्याचे दर तिपटीने वाढले आहेत तसेच मागील काळात दुधाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. सरकारने पशुखाद्याच्या दरावर नियंत्रण ठेवायला हवे. तसेच दुधाचे दर कमी झाल्यानंतर त्याच प्रमाणात पशुखाद्याचेही दर कमी झाले पाहिजेत.
– महादेव चव्हाण, दूध उत्पादक शेतकरी, वाल्हे.आपल्याकडे जर्सी आणि एचएफमधील गायी दूध उत्पादनासाठी वापरल्या जातात. त्या गाईंच्या दुधाला फॅट कमी बसते. त्यामुळे शासनाचा किमान दर शेतकर्याला मिळणे शक्य नाही. एसएनएफ कमी बसल्यास दूध संघाकडून कमी दर दिला जातो.
– अमोल खवले, डेअरी चालक.दूध दर ठरवताना शासन अजूनदेखील जुने मानांकन बघते. यामध्ये आता बदल करायला हवेत. सरकारने आता दूध दर ठरवताना 3.0 फॅट व 28 डिग्री घनता याचा विचार करूनच येणार्या एसएनएफनुसार दूध दर द्यायला हवेत.
– शिवाजी भुजबळ, दूध उत्पादक शेतकरी, वाल्हे.