पुणे : दाखल्यांसाठी सुविधा केंद्रावर प्रचंड गर्दी ! ; तलाठी, पोलिस पाटील भरतीचा परिणाम | पुढारी

पुणे : दाखल्यांसाठी सुविधा केंद्रावर प्रचंड गर्दी ! ; तलाठी, पोलिस पाटील भरतीचा परिणाम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सध्या तलाठी आणि पोलिस पाटील भरतीमुळे पुणे जिल्ह्यातील सर्व नागरी सुविधा केंद्रांवर विविध दाखले घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी वाढली आहे. संपूर्ण राज्यात एकाच वेळी तिप्पट दाखल्यांची संख्या वाढल्याने ऑनलाइन सर्व्हर सतत डाउन होत आहे. कर्मचार्‍यांना रात्र-रात्र जागून दाखले द्यावे लागत आहेत, तर दुसरीकडे अर्जदाराला दाखल्यासाठी वाट पाहावी लागत आहे. राज्य शासनाने एकाच वेळी संपूर्ण राज्यात तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. याशिवाय पुणे जिल्ह्यात पोलिस पाटील भरतीदेखील सुरू आहे. यामुळेच या भरतीचे अर्ज भरताना उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेयर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आवश्यक असल्याने दाखले घेण्यासाठी सुविधा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे.

अर्जांसमवेत हे दाखले नसल्यास अनेकदा अर्ज बाद होऊ शकतो. यामुळेच खेड तालुक्यातील तहसील कार्यालयासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात नागरी सुविधा केंद्रांवर इच्छुक उमेदवारांच्या सायंकाळपर्यंत प्रचंड गर्दी दिसत आहे. यामुळे मात्र दाखल्यांच्या ऑनलाइन सर्व्हरवर एकाच वेळी ताण वाढत असल्याने सर्व्हर डाउन होत आहे. नागरिक दिवसभर रांगामध्ये राहूनदेखील उशिरापर्यंत दाखला न मिळाल्याने रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

खेड तालुक्यात दिवसाला सरासरी 150 ते 300 दाखल्यांसाठी अर्ज दाखल होतात. परंतु आता तलाठी व पोलिस पाटील भरतीमुळे हीच संख्या तब्बल तिप्पट वाढली असून, दिवसाला दीड-दोन हजार अर्ज दाखल होत असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी संपूर्ण रात्रभर जागून सध्या दाखले तयार करण्याचे काम केले जात आहे.

तलाठी भरतीसाठी अर्जासाठी मुदत वाढ द्या
तलाठी भरतीसाठी 17 जुलैपर्यंत अर्ज करण्याची अखेरची मुदत आहे. परंतु शासनाच्या विविध दाखले मिळण्याचे संकेतस्थळाचा सर्व्हर गेल्या अनेक दिवसांपासून डाउन असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांना आवश्यक दाखले मिळण्यास उशीर होत आहे. तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी दिवस-रात्र काम करूनही वेळेत दाखले देणे शक्य होत नाही. यामुळेच तलाठी भरतीसाठी अर्ज करण्यास मुदत वाढ देण्याची मागणी केली जात आहे.

भरतीप्रक्रियेमुळे दाखल्यांसाठीचे अर्ज मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सेतू केंद्रातील व तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी दिवस-रात्र बसून नागरिकांना वेळेत दाखले देण्यासाठी काम करत आहेत. गेल्या महिनाभरातील सर्व प्रलंबित दाखल्यांचे वाटप पूर्ण झाले आहे. अर्ज केल्यानंतर 7 दिवसांच्या आत दाखला देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
                                                प्रशांत बेडसे-पाटील, तहसीलदार, खेड 

हे ही वाचा :

सरोज अहिरेंचा अजित पवार यांना पाठिंबा, म्हणाल्या विकासाठी सत्तेत राहणं गरजेचं

सातारा : शाळकरी मुलाचे कोयत्याने बोट छाटले

Back to top button