पुणे : केडगावला नियोजनबद्ध विकासाची गरज | पुढारी

पुणे : केडगावला नियोजनबद्ध विकासाची गरज

यवत (पुणे ) : दौंड तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या केडगाव ग्रामपंचायतीला नियोजनबद्ध विकासाची गरज असून, यासाठी सर्वपक्षीय नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. पुणे शहराचे उपनगर म्हणून उदयास येत असलेल्या केडगावचा नियोजनबद्ध विकास झाली नाही, तर बकालपणा वाढीस लागून गुंतवणूक व बाजारपेठ यावर दुष्परिणाम होऊ शकतो. केडगाव हा 22 गावांचा नाका म्हणून ओळखले जाते, त्यामुळे परिसरातील गावांचे नागरिक छोटी-मोठी गुंतवणूक करण्यासाठी केडगाव आणि परिसराला प्राधान्य देत असतात. केडगावचा नियोजनबद्ध विकास झाला, तर गुंतवणूकदार वाढून या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होऊ शकतो.

केडगाव बाजारपेठेत मोठे व्यावसायिक असून, या ठिकाणी असणार्‍या व्यावसायिकांना लागणारा माल उतरविण्यासाठी येणार्‍या मालवाहतूक गाड्या मुख्य बाजारपेठेत उभ्या करण्यात येतात, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो तसेच माल खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक देखील बेशिस्त पद्धतीने पार्किंग करतात. त्यामुळे वाहतूकव्यवस्था कोलमडून पडते आणि बाजारपेठेत वाहनांच्या रांगा लागतात, यावर पोलिस आणि ग्रामपंचायत यांनी सम-विषम पार्किंगव्यवस्था करणे गरजेचे आहे.

कचरा आणि सांडपाणी
केडगाव स्टेशन भागात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारण्यात आले असले, तरीही या ठिकाणी असणार्‍या कचर्‍याची नेमकी विल्हेवाट कशी लावायची, याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने गृहप्रकल्पाशेजारी किंवा भिंतीलगत कचरा टाकण्यात येत आहे. मोठे गृहप्रकल्प आणि ग्रामपंचायत यांनी एकच मोठा घनकचरा प्रकल्प उभा करावा लागणार आहे. गृहप्रकल्प आणि या परिसरातील नागरी भागातून निघणारे सांडपाणी जवळील ओढ्यामध्ये सोडण्यात येत असून, या सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यास या भागात येणारा उग्र वास कमी होऊ शकतो. या पाण्याचा सामाजिक वनीकरण करण्यात आलेल्या भागात वापर करता येऊ शकतो.

समान प्रमाणात पाणी
केडगाव भागातील नागरीकरण असलेल्या भागात समान प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने या भागात राहणारे नागरिक कायम तक्रार करतात. त्यामुळे प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेत सर्व भागांत समान पाणीपुरवठा कसा करता येईल? याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देणे गरजेचे आहे.

राजकीय इच्छाशक्ती
केडगावसारख्या मोठ्या गावात विकास करीत असताना अडचणी देखील निर्माण होऊ शकतात. परंतु, पक्षीय आणि गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून एक नियोजित विकास आराखडा तयार करून त्यावर काम करणे योग्य राहील, असे सर्वसामान्य नागरिकांचे मत आहे. यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या भागात काम करणार्‍या राजकीय नेत्यांनी सकारात्मक इच्छाशक्ती दाखविली पाहिजे.

 

 

Back to top button