पुणे : पुढारी वृत्तसेवा : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकर्यांना दुचाकीवरून जाऊन आरोग्यदूतांनी उपचार केले. दोन्ही पालखी सोहळ्यामधील 4 हजार 120 वारकर्यांची तपासणी आरोग्यदूतांमार्फत करण्यात आली. दोन्ही मार्गांवर ज्याठिकाणी मोठी रुग्णवाहिका वेळेत पोहचू शकत नाही, अशा ठिकाणी आरोग्यदूतांनी सेवा दिल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दोन्ही मार्गांवर प्रत्येकी 25 अशा पन्नास आरोग्यदूतांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये प्रशिक्षण दिलेले समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक यांची निवड करण्यात आली होती. प्रत्येक आरोग्यदूताच्या दुचाकीवर औषधोपचार पेटी बसविण्यात आली होती.
त्यामध्ये 25 औषध किट, प्रथमोपचार साहित्य, स्टेथोस्कोप, डिजीटल बीपी ऑपरेटर, पन्नास ओटीकिट उपलब्ध करून देण्यात आले होते. यावर्षी आरोग्यदूतांनी वारकर्यांवर उपचाराशिवाय टँकरमधील पाण्याची तपासणी, पाणी भरण्याचे ठिकाणे, हॉटल्सची तपासणी करण्यात आली. आरोग्यदूतांना पालखी मार्गावरील कामकाजाबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले होते, त्यामुळे विविधप्रकारचे खाद्यान्न विक्रेते, खानावळ, हॉटेल येथे भेट देऊन आरोग्यविषयक, स्वच्छता, हॉटेल कामगारांची वैयक्तिक स्वच्छता, त्यांची मेडिकल तपासणीचे प्रमाणपत्र पाहणे आदी बाबींची माहिती घेऊन त्यांच्या नोंदी ठेवण्याचे काम आरोग्यदूतांनी केले.
याबाबत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे म्हणाले, 'प्रत्येक आरोग्यदूत हा दिंडीप्रमुखांच्या संपर्कात होता, त्यामुळे पालखी मार्गावर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी, वाडी-वस्तीवर विखुरलेल्या दिंड्यांना रात्री-अपरात्री, जेथे रुग्णावाहिका जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी वारकर्यांना तत्काळ औषधोपचार करण्यासाठी दुचाकीवरील आरोग्यदूतांची मदत झाली. वारकरीही उपचार घेण्यास टाळाटाळ करतात आणि आजार अंगावर काढतात. हे टाळण्यासाठी आणि वारकर्यांना आहे त्या ठिकाणी वेळेत औषधोपचार मिळावे, हा आरोग्यदूतांची सेवा देण्यामागे मुख्य उद्देश होता.'
आरोग्यदूतांनी केलेली तपासणी
पालखीचे ओपीडी टँकर टँकर हॉटेल
नाव भरणा केंद्र
श्री संत ज्ञानेश्वर महाराज 2,135 160 327 269
श्री संत तुकाराम महाराज 1,985 115 142 252
एकूण 4,120 275 4692 521