Ashadhi wari 2023 : पालखी सोहळ्यासाठी ‘शिरसाई’ला आवर्तन
उंडवडी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी (दि. 17) उंडवडी सुपे येथे मुक्कामी आहे. सोहळ्यातील वारक-यांना तसेच गावकर्यांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न भासू नये यासाठी शिरसाई कालव्याला आवर्तन सोडण्यात आले आहे. उंडवडी सुपे येथील पाणी पुरवठा करणार्या विहिरीने तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. यासाठी शिरसाई कालव्यातून उंडवडी सुपे येथील भाऊसाहेब तलाव, खोरीचा तलाव, प्रादेशिक तलाव भरण्यात यावा, अशी मागणी गावकर्यांनी केली होती.
त्या अनुषंगाने तलावात पाणी सोडण्यात आल्याने गावकर्यांनी समाधान व्यक्त केले. येथील पाणी पुरवठा करणार्या विहिरीजवळील तलावात पाणी सोडण्यात आले आहे. शिवाय जर पाणीटंचाई निर्माण झाली तर ग्रामपंचायतीतर्फे टँकर उपलब्ध करण्यात येतील, असे ग्रामसेवक विनोद आटोळे यांनी सांगितले. शिरसाई कालव्यातून उंडवडी सुपे येथे दोन दिवस आवर्तन चालणार आहे, असे पाटबंधारे विभागाचे स्थापत्य अभियंता अमोल शिंदे यांनी दिली.
हेही वाचा
सातारा : आनेवाडी महामार्गावर बर्निंग बसचा थरार; २७ प्रवाशी बचावले