पुणे: सत्ता कोणासाठी, कशी वापरायची याचा छत्रपती शिवाजी महाराज हे वस्तुपाठ: शरद पवार | पुढारी

पुणे: सत्ता कोणासाठी, कशी वापरायची याचा छत्रपती शिवाजी महाराज हे वस्तुपाठ: शरद पवार

पुणे, पुढारी वृत्तसेवा: देशात अनेक राजे होऊन गेले, देवगिरीचे यादव, दिल्लीचे मुघल, आदिलशाह होऊन गेले. अशी अनेकांची नावे सांगता येतील ज्यांनी राज्य केलं. पण त्यांचं राज्य त्यांच्या घराण्याच्या नावाने चाललं. याला एकच अपवाद शिवछत्रपतींचा होता. त्यांनी कधी भोसले घराण्याचे राज्य केलं नाही. तर त्यांनी उभं केलं ते हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य. राज्य चालवायचं ते रयतेसाठी चालवायचं, हा आदर्श त्यांनी देशासमोर घालून दिला, असे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केले.

अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने लाल महालात ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. पवार म्हणाले, या दिवशी शिवरायांनी राज्य कारभार स्वीकारला. पण राज्य कोणासाठी करायचं? तर राज्य हे सर्वसामान्यांसाठी करायचं. तसेच शक्ती आणि सत्ता जनतेसाठी वापरायची हे सूत्र शिवछत्रपतींनी आपल्यासमोर ठेवलं .

सत्ता ही कशी आणि कोणासाठी वापरायची असते याचा देखील आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घातला होता, असेही शरद पवार यावेळी म्हणाले काही घटकांनी त्याला वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला, पण या राज्यातील सामान्य माणसानी पहिल्यांदा आपला राजा सत्तेवर बसला आहे, ही भूमिका अंतःकरणापासून स्वीकारली. आज आदर्श राजाच्या सत्ताग्रहनाचा सोहळा लाल महालात होतोय, याला एक इतिहास आहे असेही शरद पवार म्हणाले.

आज तीनशे-साडेतीनशे वर्ष झाल्यानंतर देखील देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही एक साधा प्रश्न विचारला की सर्वसमान्य माणसांच्या अंतःकरणात तीनशे-साडेतिनशे वर्ष राहिलेला राजा कोण? तर आसाम असो किंवा केरळ एकच नाव येतं ते शिव छत्रपतींचं. कारण त्यांनी राज्य हे कधीही स्वतःसाठी चालवलं नाही, असे शरद पवार म्हणाले.

Back to top button