पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: शिक्षण तसेच नोकरीसाठी परराज्यातून आलेल्या मुलींनी राहण्यासाठी पसंती दिलेल्या थेरगाव येथील गणेशनगरमध्ये पोलिसांनी पायी गस्त घातली. स्थानिक नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी यापूर्वी पायी गस्तीची मागणी केली होती. त्यानुसार, गुरुवारी (दि. 1) सायंकाळी सहा ते आठच्या दरम्यान वाकड पोलिसांचा मोठा फौजफाटा गणेशनगरच्या रस्त्यावर पहावयास मिळाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, थेरगाव परिसरातील गणेशनगरमध्ये परराज्यातून आलेले तरुण-तरुणी मोठ्या संख्येने राहत आहेत. त्यामुळे गणेशनगरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ छोटी खाऊगल्ली तयार झाली आहे. या ठिकाणी काळाखडक झोपडपट्टीसह इतर ठिकाणची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली टोळकी घिरट्या घालत असतात. अनेकदा यातून छोटे-मोठे वाददेखील झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर स्थानिक माजी नगरसेविका माया बारणे यांनी वाकड पोलिसांना याठिकाणी पायी गस्त सुरू करण्याबाबत पत्र दिले होते. तसेच, काही स्थानिकांनी पोलिसांकडे रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी गणेशनगर परिसरात पायी गस्त घालत स्थानिकांशी संवाद साधला. तसेच, काही संशयित तरुणांची झाडाझडतीेदेखील घेतली. अचानक कॉलनीतील रस्त्यांवर पोलिसांचा एवढा मोठा फौजफाटा पाहून नागरिक संभ्रमात पडले. मात्र, रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस गणेशनगरमध्ये आल्याचे समजताच नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
गणेशनगरमध्ये दिवसेंदिवस वर्दळ वाढत आहे. हिंजवडी आयटीत काम करणारा तरुण वर्गदेखील या परिसरात वास्तव्यास आहे. मात्र, अलीकडे टवाळखोरांचादेखील वावर वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी सातत्याने गस्त घालणे अपेक्षित आहे.
– माया बारणे, माजी नगरसेविका, थेरगावपोलिसांनी पायी गस्त घालून नागरिकांशी संवाद ठेवणे, हा स्तुत्य उपक्रम आहे. ज्यामुळे नागरिक आणि पोलिसांमध्ये असलेली दरी नक्कीच दूर होईल. वाकड पोलिसांनी गणेशनगरमध्ये पायी गस्त घातल्याने नागरिकांमध्ये सुरक्षित भावना जागृत झाली आहे.
– अनिकेत प्रभू, स्थानिक नागरिक
हेही वाचा: