पालखी मार्ग झाला सुनासुना; उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी पालखी मार्गावर मंडप | पुढारी

पालखी मार्ग झाला सुनासुना; उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी पालखी मार्गावर मंडप

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दरवर्षीपेक्षा एक महिना अगोदर पालख्यांचे प्रस्थान होत असल्याने वारकर्‍यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी. ग्रामीण भागात पालखीतळ आणि विसाव्याच्या दरम्यान मांडवाची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. दै. ‘पुढारी’ने मागील पाच दिवसांपासून पालखी महामार्गावरील झाडांची तोड झाल्याने वारकर्‍यांना उन्हाचा त्रास सहन करत मार्गक्रमण करावे लागणार असल्याचे विविध बातम्यांतून स्पष्ट केले होते. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी मांडव टाकण्याचे दिशानिर्देश दिले.
आषाढी वारी सोहळा-2023 पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. ऑनलाइनद्वारे महसूलमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. आमदार दत्तात्रय भरणे, संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुण्याचे सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी  डॉ. राजेश देशमुख, पालखी सोहळ्याचे प्रमुख आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी भाविकांना पालखीमार्ग, पालखीतळ, विसावा आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. पालखी प्रस्थान लवकर होणार असल्याने उन्हाळ्याचा त्रास होऊ शकतो. यासाठी पुरेसा ओआरएसचा साठा, औषधे, पिण्याच्या पाण्याचे अधिकाधिक टँकर ठेवावेत.
पाण्याच्या स्रोतांची, पाण्याची वेळोवेळी तपासणी करावी, रुग्णवाहिका वाढवाव्यात. आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व पथके, यंत्रणा सज्ज ठेवाव्यात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी या मोठ्या पालख्यांबरोबरच अन्य सर्व पालख्यांच्या मार्गावरील रस्त्यांचे खड्डे बुजविण्यात यावेत, साईडपट्ट्या भराव्यात. रस्त्यांच्या डागडुजीचे प्रस्ताव तत्काळ सादर करून पालखी प्रस्थानापूर्वी सर्व कामे पूर्ण करून घ्या, अशा सूचना दिल्या.

Back to top button