‘त्या’ वाक्यामुळे जयंत पाटील ईडीच्या रडारवर | पुढारी

‘त्या’ वाक्यामुळे जयंत पाटील ईडीच्या रडारवर

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ‘फौजदाराचा हवालदार झाला’ हे वाक्य जिव्हारी लागल्यामुळे त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू करण्यात आली. भाजप नेत्यांनी राजकीय सूडबुद्धीने ईडीची कारवाई करून जयंत पाटील यांच्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याला त्रास देऊन नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी सोमवारी (दि.22) केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठविल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पिंपरी येथील डॉ. आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजपा वॉशिंग मशीन व ईडी वॉशिंग पावडर याचं प्रात्यक्षिक सादर करून भाजपकडून विरोधकांना नामोहरम करण्यासाठी ईडीचा कशाप्रकारे वापर केला जातो, हे दाखवण्यात आले.

त्या वेळी शेख बोलत होते. तसेच, देवेंद्र तायडे, राजन नायर, तानाजी खाडे, युवराज पवार, मीरा कदम, राजेंद्रसिंग वालिया यांची भाषणे झाली. आंदोलनात प्रदीप गायकवाड, राहुल पवार, ओम क्षीरसागर, राजू खंडागळे, विकास कांबळे, संजय औसरमल, प्रकाश सोमवंशी, सतीश दरेकर, कविता खराडे, मनीषा गटकळ, निकिता कदम, पीयूष अंकुश, सनी वाघमारे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

शेख म्हणाले की, जयंत पाटील यांच्यावर राजकीय आकसाने ईडीची कारवाई केली जात आहे. या 9 वर्षात भाजपच्या एकाही आमदार व खासदारांना ईडीची नोटीस देण्यात आली नाही. परंतु, महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांना जाणून-बुजून सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून त्रास देण्याचे काम हे सरकार करत आहे. हे प्रकार थांबले नाहीत, तर भाजप नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला.

Back to top button