पुणे; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन दिवसांपासून शहरातील रात्रीचे तापमानही विक्रमी उंबरठ्यावर गेले असून, दिवसा 39 ते 41 अंशांवर, तर रात्री 10.30 नंतर 29 ते 30 अंशांवर जात आहे. त्यामुळे रात्रीही पुणेकर असह्य उकाड्याने हैराण झाले आहेत. गुरुवारपासून शहरात रात्रीचे तापमान अचानक 30 अंशांवर गेल्याने नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण झाले. शहरातील वडगावशेरी, कोरेगाव पार्क भागाचे तापमान 30.9, तर शिवाजीनगरचे तापमान 30.8 अंशांवर गेले. त्यामुळे शहरात वेदर डिसकम्फर्ट जाणवत आहे. दिवसभर उकाड्याने हैराण झालेले नागरिक आता रात्रीही निर्माण झालेल्या उकाड्याने हैराण झाले आहेत.
शहरात उष्ण रात्रींचा प्रवाह सुरू झाला आहे. मार्चमध्ये शहराचे किमान तापमान 18 ते 19 अंशांवर होते. तर एप्रिलमध्ये ते 22 ते 24 अंशांवर गेले. सायंकाळ झाली की शहर थंड होऊन रात्री उकाडा जाणवत नव्हता. गार वार्यामुळे रात्री लवकर झोप लागत होती. मात्र, गेल्या चार दिवसांपासून रात्री 10.30 नंतर शहराचे तापमान 30 अंशांवर जात आहे. त्यामुळे पुणेकरांची रात्रीची झोप उडाली आहे.
हवामानतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील बहुतांश भागांत अतिशहरीकरणामुळे उष्णतेची बेटे तयार झाली असून, यात कोरेगाव पार्क, वडगाव शेरी, शिवाजीनगर भागात हे प्रमाण जास्त जाणवत आहे. दिवसा तयार झालेली उष्णता उंच काचेच्या इमारती, सिमेंटचे रस्ते, उड्डाणपूल यामुळे ती त्या परिसरातून रात्रीही बाहेर जात नाही. त्यामुळे या भागाचे तापमान इतर भागांपेक्षा कायम 3 ते 4 अंशांनी जास्त राहते.
गेल्या काही दिवसांपासून दिवसा खूप उकाडा आहे. तसेच आर्द्रताही वाढली आहे. त्यामुळे वाढते तापमान व आर्द्रता यांच्या मिश्रणामुळे रात्री अस्वस्थ करणारे वातावरण तयार झाले आहे.
– डॉ. के. एस.
होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, हवामान विभाग, पुणे