पिंपरी : उद्घाटन न करताच चिखली केंद्रातून पाण्याचे वितरण

पिंपरी : उद्घाटन न करताच चिखली केंद्रातून पाण्याचे वितरण
Published on
Updated on

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरासाठी चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची वेळ मिळत नसल्याचे त्या केंद्राचे उद्घाटन गेल्या सहा महिन्यांपासून उद्घाटन रखडले आहे. असे असताना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून त्या केंद्रातून दररोज 50 एमएलडी पाणी नागरिकांना वितरीत करण्यात येत आहे. हा पुरवठा प्रायोगिक तत्वावर असल्याचे सांगण्यात येत आहे.

शहराची वाढती लोकसंख्या व शहराचा विस्तार लक्षात घेऊन आंद्रा आणि भामा-आसखेड धरणात 267 एमएलडी पाणी साठा राज्य शासनाने महापालिकेसाठी मंजुर केला आहे. हे दोन्ही प्रकल्प अद्याप प्राथमिक अवस्थेत आहेत. तात्पुरता उपाय म्हणून निघोजे येथे अशुद्ध जलउपसा केंद्र उभारून इंद्रायणी नदीतून पाणी उचलण्यात येत आहे. ते पाणी 300 एमएलडी क्षमतेच्या चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणून आजूबाजूच्या परिसराला दिले जाणार आहे. त्यासाठीची अंतर्गत जलवाहिनी, पाण्याची टाकी, विद्युत जोड आदी आवश्यक कामे नोव्हेंबर 2023 ला पूर्ण झाली आहेत.

चिखली केंद्राच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळाली. मात्र, ती ऐनवेळी रद्द झाली. मात्र, आता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची वेळ मिळत नाही. उद्घाटन होत नसल्याने महापालिका प्रशासनाची गोची झाली आहे. अद्याप कामे अपुर्ण असल्याचे कारण पुढे करून पाणी देण्यास सुरूवात केली नसल्याने वारंवार सांगत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह हे आपली बाजू पटवून देत आहेत.

तर, दुसरीकडे पाणीपुरवठा विभागाने प्रायोगिक तत्वावर दररोज 50 एमएलडी पाणी देण्यास सुरूवात केली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून हे पाणी चिखलीच्या आजूबाजूच्या परिसराला देण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरातील पाण्याच्या तक्रारी कमी झाल्याचा दावा अधिकार्यांनी केला आहे.

केंद्राची तांत्रिक क्षमता वाढल्यानंतर टप्पाटप्प्याने 100 एमएलडी पाणी दिले जाणार आहे, असे अधिकार्यांनी स्पष्ट केले.
चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून 50 एमएलडी पाणीपुरवठा फेब्रुवारी महिन्यापासून सुरू करण्यात आला आहे. ते पाणी चिखली परिसरातील भागांना देण्यात येत आहे. हे पुरवठा प्रायोगिक तत्वावर सुरू आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.

पाणीपुरवठा करताना निर्माण झाल्या अनेक समस्या

चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा करताना अनेक अडचणी आल्या आहेत. इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात शेवाळ आहे. त्यामुळे पाणी शुद्ध करताना अनेक समस्या निर्माण होत होत्या. तसेच, वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणी शुद्धीकरण प्रक्रिया बंद पडत होती. इंद्रायणी नदीचा प्रवाह कायम एक सारखा नसतो. त्यामुळे निघोजे बंधारा येथे पाण्याची पातळी अनेकदा कमी असते. परिणामी, पुरेशा प्रमाणात पाणी उचलता येत नाही. तसेच, आंद्रा ते निघोजे या इंद्रायणी नदी काठावरील गावांचे सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने पाणी दूषित होत आहे.

चिखलीचे पाणी मिळाल्याने एमआयडीसीचे केले कमी

चिखली जलशुद्धीकरण केंद्रामधून सद्यस्थितीत 50 एमएलडी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पवना धरणातून म्हणजे निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातून 510 एमएलडी पाणी दिले जात आहे. एमआयडीसीकडून 30 एमएलडी शुद्ध पाणी दिले जाते. चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून अतिरिक्त 50 एमएलडी पाणीपुरवठा सुरू केल्याने एमआयडीसीचे पाणी 30 वरून 20 एमएलडी असे कमी करण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news