वाल्हे : शेतकरी मान्सूनपूर्व मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत | पुढारी

वाल्हे : शेतकरी मान्सूनपूर्व मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत

वाल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मृग नक्षत्र सुरू व्हायला अवघा एक महिना राहिला आहे. परिणामी शेतकर्‍यांची उन्हाळी हंगाम आवरण्याची लगबग सुरू आहे. मागील महिनाभरापासून उन्हाचे तीव्र चटके जाणवत असल्याने, शेतकर्‍यांनी पहाटे व सायंकाळी ऊन कमी झाल्यावर मशागतीची कामे करण्यावर भर दिला आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिल्याने मशागतीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. आता शेतकरी मान्सूनपूर्व मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत दिसत आहेत.

मार्च ते मे या चार महिन्यांत वाल्हे व परिसरात फक्त दोनदाच (दि. 13 व 28 एप्रिल) अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या होत्या. त्यांनतर पाऊस पडलाच नाही, त्यामुळे खरीप हंगामासाठी पूर्वमशागतीची तयारी करणारे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील काही दिवसांपासून दुपारनंतर दररोज आकाशात दाट ढग दाटून येत आहेत.

मात्र, पाऊस काही पडलेला नाही. अनेक शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केली असून, मान्सूनपूर्व पाऊस पडला नसल्याने नांगरणी करताना मातीची मोठी ठेकळे फुटली नाहीत. नांगरणी केलेली जमीन तापली असून, आता जोरदार पावसाची आवश्यकता आहे. जोरदार पाऊस झाल्यानंतर शेतकरीवर्गाला शेतीची मशागत करताना सोपे होणार असून, शेतकरीवर्ग आता जोरदार पावसाकडे डोळे लावून बसले आहेत.

या वर्षी मान्सूनपूर्व पाऊस न पडल्याने वाल्हे गावाच्या पूर्वेकडील वाड्या-वस्त्यांवर आता पाणीटंचाई थोड्या प्रमाणात जाणवू लागली आहे. मागील वर्षी मान्सूनपूर्व पाऊस वाल्हे व परिसरात कमी प्रमाणात पडला होता. तसेच, मान्सूनचा पाऊस थोड्याच प्रमाणात पडला होता. मात्र, पावसाच्या परतीच्या प्रवासात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी होऊन शेतकरीवर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

त्यामुळे या वर्षी एप्रिल-मे महिन्यात काही प्रमाणात दौंडज, हरणी, पिंगोरीचा काही भाग, तसेच वाल्हे गावाच्या पूर्वेकडील वाड्या-वस्त्यांवरील भागातील विहिरी, बोअरवेल यांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या वर्षी मान्सूनपूर्व पाऊस पडला नसल्याने तसेच पुढेही मान्सून व परतीचा मोठा पाऊस पडेल की नाही, या विचाराने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.

Back to top button