बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र पोलिस अत्यंत सक्षम आहे. पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी असते. तुकाराम ओंबाळेंसारख्या कर्तव्यदक्ष पोलिसांची मोठी परंपरा राज्याला आहे. चुकीची कामे करून या खात्याला बदनाम करू नका. गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी आपण सरकारी सेवेत आहोत याचे भान ठेवा. नागरिकांची अडवणूक करण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तुमच्या पदाचा वापर करा, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पोलिस दलात नव्याने भरती झालेल्यांना केले.
विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने पोलिस दलात भरती झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. महाविद्यालयातील करिअर कट्टा अंतर्गत राज्यसेवा व पोलिस दलात निवड झालेल्या जवळपास 60 विद्यार्थ्यांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते झाला. राज्य माहिती तंत्रज्ञान साहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनेत्रा पवार अध्यक्षस्थानी होत्या. संस्थेच्या सचिव अॅड. नीलिमा गुजर, डॉ . राजीव शहा, मंदार सीकची, किरण गुजर, प्राचार्य डॉ.भरत शिंदे, करिअर कट्टा समन्वयक डॉ.सुनील ओगले आदी या वेळी उपस्थित होते. शासनाच्या करिअर कट्टा अंतर्गत विविध उपक्रम राबवून या महाविद्यालयाने सर्वोत्कृष्ट महाविद्यालय तसेच डॉ.सुनील ओगले यांनी उत्कृष्ट समन्वयक व उत्कृष्ट जिल्हा समन्वयक असे पुरस्कार पटकावल्याचे गौरवोद्गार शितोळे यांनी काढले.
महाविद्यालयाचे प्राचार्य भरत शिंदे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रशिक्षक विशाल चव्हाण व विशाल भोसले यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. डॉ. सुनील ओगले यांनी करिअर कट्टा अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संस्थेचे रजिस्टार श्रीश कंबोज, विविध शाखांचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. डॉ. आनंदा गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संजय खिलारे यांनी आभार मानले.