पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण अर्थात आरटीएने पुण्यात अॅपद्वारे होणार्या रिक्षा वाहतुकीसाठी आलेले परवाने नाकारले आहेत. त्यामुळे पुण्यातील रिक्षाचालकांमध्येच फूट पडली असून, रिक्षाच्या वर्तुळात 'कही खुशी, कही गम'चे वातावरण आहे.
मागील वर्षात रॅपिडो कंपनीच्या अॅपद्वारे दुचाकीच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक जोरात सुरू होती. त्या वेळी पुणे, पिंपरीसह जिल्ह्यातील सर्व रिक्षाचालकांनी याला एकत्र येत विरोध केला आणि अखेर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ही सेवा बंद झाली.
परंतु, आता तीनचाकी रिक्षाची अॅपद्वारे होणारी सेवासुध्दा अनधिकृतरीत्या सुरू असल्याचे समोर आले आहे. त्या सेवेमार्फत मोटार वाहन कायद्यातील नियमांची पूर्तता होत नाही. त्यामुळे आरटीएने या सेवेसाठी परवाना नाकारला आहे. यामुळे काही रिक्षाचालक नाराज झाले आहेत, तर काहींनी समाधान व्यक्त केले आहे.
आम्हाला कोणत्याही अॅपची गरज नाही. परिवहन विभागाने आमच्या गाड्यांना मीटर दिला आहे. तो मीटर आमच्यासाठी फायद्याचा आहे. अॅपद्वारे प्रवासी वाहतूक करणे आम्हाला परवडत नाही. त्यामुळे परिवहन विभागाने अॅप बंद करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे.
– सुदर्शन शेडगे, रिक्षाचालक, पुणेरिक्षा मीटरने आम्हाला प्रवाशांसाठी रिक्षाथांब्यांवर तासन् तास थांबावे लागत आहे. थांब्यावर थांबूनदेखील प्रवासी तेथे येईल, याचा भरवसा नसतो. त्यामुळे मीटरपेक्षा आम्हाला अॅपच्या माध्यमातून पटापट प्रवासी व पैसेही मिळतात.
– रवींद्र गोगावले, रिक्षाचालक, पुणे
पुणे विभागातील रिक्षा संख्या
पुणे शहर – 91,454
पिंपरी-चिंचवड – 26,600
बारामती – 2,285
जिल्हा एकूण रिक्षा – 1,20,339