कोण संजय राऊत? मी कोणाचेही नाव घेतले नव्हते; अजित पवार यांचा टोला | पुढारी

कोण संजय राऊत? मी कोणाचेही नाव घेतले नव्हते; अजित पवार यांचा टोला

पुणे, पुढारी ऑनलाईन: “मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा जो काही निकाल आला आहे, त्याबाबत राज्य सरकारनं त्यांच्या विधी व न्याय खात्यातील तज्ज्ञ लोकांना आणि विरोधी पक्षाला विश्वासात घेत यावर तातडीनं काय उपाय करता येईल, यावर विचार केला पाहिजे,” असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नमूद केले. “कोणावर अन्याय होऊ नये याची खबरदारी सरकारनं घ्यावी,” असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. “तुम्ही बोलल्यानंतरही खासदार संजय राऊत सल्ले देत आहेत, त्यांची मतं मांडत आहेत,” असा प्रश्न त्यांना या पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी कोण संजय राऊत ? असं म्हणत जोरदार टोलाही लगावला. “मी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, कुणाच्या नादाला का लागावं? मी फक्त आमचा पक्ष आणि आमच्यापुरतं बोललो होतो,” असंही पवार म्हटलं आहे.

तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले की, खारघरच्या घटनेसंदर्भात मी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. राज्य सरकारनं त्यात मृतांचा आकडा घोषित केला आहे. परंतु, निश्चित आकडा मिळत नाही. दबक्या आवाजात काही लोक त्या उष्माघातात लोकांना वेळेवर काही गोष्टी मिळाल्या नाहीत असं म्हणतात. मी या घटनेतील मृत लोकांच्या पोस्टमार्टमचा रिपोर्ट माहितीच्या अधिकारात मागवला आहे. पण काही लोक म्हणतात की, जी संख्या सांगितली जात आहे, त्यात तफावत आहे असंही अजित पवार यावेळी म्हणाले. जेव्हापासून महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास सुरुवात तेव्हापासून यावेळी सर्वाधिक खर्च केला गेला आहे. त्त्यांची सर्व टीम तिकडे राबत होती. राज्याचे मुख्यमंत्रीही तिकडे जात होते. असं असतानाही तिथे लोकांना पाणीही मिळालं नाही, अशी ऐकीव माहिती आहे. ही गंभीर बाब आहे, म्हणूनच मी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

गेल्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी २०२२ मध्ये राज्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुका होणार होत्या. त्यावेळी अनेक इच्छुक उमेदवारांनी निरनिराळ्या पद्धतीनं आपलं मार्केटिंग केलं, जाहिरतबाजी केली. पण, झाली का निवडणूक? आता ते बिचारे कधी निवडणूक लागते म्हणून कंटाळून गेले. त्यामुळे जेव्हा निवडणूक जाहीर होईल, तेव्हा एकत्र बसू आणि चर्चा करू. तसेच महाविकास आघाडीच्या संदर्भात काय भूमिका घ्यायची, कोणाला उमेदवारी द्यायची, गेल्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या घटकपक्षांचे किती नगरसेवक आले हे पाहून पुढील भूमिका ठरवू, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Back to top button