पुणे : अतिक्रमण कारवाईविरोधात आंदोलन; सदाभाऊ खोत यांनी पालिकेबाहेर कांदा विकून केला निषेध | पुढारी

पुणे : अतिक्रमण कारवाईविरोधात आंदोलन; सदाभाऊ खोत यांनी पालिकेबाहेर कांदा विकून केला निषेध

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जप्त केलेला शेतकर्‍यांचा कांदा विक्रीचा टेम्पो सोडावा तसेच संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करावी, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी महापालिकेसमोर आंदोलन केले. या वेळी त्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर कांदा विकून प्रशासनाचा निषेध केला.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पुणे-सोलापूर रस्त्यावर हडपसर येथे रस्त्याच्या कडेला कांदा विक्री करणार्‍या टेम्पोवर कारवाई केली. कारवाईनंतर त्याला 40 हजार रुपयांचा दंड लावण्यात आला. टेम्पो सोडविण्यासाठी संबंधित शेतकर्‍याला गेले आठ दिवस पळविले जात आहे, असा आरोप करत खोत यांच्या संघटनेने शनिवार वाडा ते महापालिका भवन असा मोर्चा काढून महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले.

या आंदोलनात खोत यांच्यासह त्यांच्या संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. या वेळी खोत यांनी प्रवेशद्वारावरच कांदा विक्री केला. त्यानंतर खोत व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गेटवरून उड्या घेऊन महापालिका भवनाच्या परिसरात प्रवेश केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पालिका प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

शेतकर्‍यांसाठी महापालिका देणार जागा
शेतकर्‍यांनी आपला माल शहरात विक्री करावा, अशी आमचीही भूमिका आहे. यासाठी आम्ही शहरात विविध ठिकाणी जागा उपलब्ध करून देणार आहोत. या ठिकाणांची यादी आम्ही जाहीर करू. तेथे शेतकर्‍यांनी आपला माल विक्री करावा. मात्र, वाहतुकीला अडथळा निर्माण करून रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणार्‍यांवर कारवाई होणार, असा इशारा महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला.

रस्त्याच्या कडेला कांदा विक्री करणार्‍या शेतकर्‍यावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केल्यानंतर माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी महापालिकेसमोर आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर बोलताना आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, की महापालिकेने आपल्या अंदाजपत्रकामध्ये हॉकर्स पार्कचे नियोजन केले आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या अख्त्यारीत असणार्‍या ओपन स्पेस व आरक्षित जागांची निवड केली जाणार आहे.

या जागांची यादी पुढीत दोन-तीन दिवसांत जाहीर केली जाईल. या ठिकाणी शेतकर्‍यांनी आपल्या मालाची विक्री करावी. वाहतुकीला अडथळा करून रस्त्यावर व्यवसाय करू नये. अशा प्रकारे रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणार्‍यांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येईल. रस्त्याच्या कडेला व्यवसाय करण्याचे प्रमाण रात्रीच्या वेळी जास्त असते, त्यामुळे ही कारवाई आता रात्रीच्या वेळीही केली जाणार असल्याचे कुमार यांनी सांगितले.

आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी गरीब शेतकरी शहरात येऊन शेतीमाल विक्री करतात. मात्र, महापालिका त्यांच्यावर अन्यायकारक कारवाई करते. बार्शी तालुक्यातील शेतकरी रमेश आरगडे हे हडपसर येथे कांदा विक्री करताना त्यांच्यावर कारवाई करून 40 हजार रुपये दंड केला. अशाप्रकारे अन्यायकारक कारवाई करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी तसेच कोणताही दंड न करता आरगडे यांचा कांदा व टेम्पो सोडण्यात यावा.
                                               – सदाभाऊ खोत, माजी राज्यमंत्री

Back to top button