ऊन-पावसाने शेतकरी हतबल; दुपारनंतर अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा
उंडवडी; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याच्या संपूर्ण ग्रामीण भागात अवकाळी पावसासह सोसाट्याचा वारा सुटत असल्याने याचा शेतीवर मोठा परिणाम जाणवत असून, जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. मागील आठवडाभरापासून दुपारी तीननंतर काही भागांत अवकाळी पावसासह गारपीट व जोरदार वारे वाहतात. यामुळे फळबागांसह शेतातील इतर पिकांवर परिणाम होत आहे. जोरदार वार्यामुळे पिके भुईसपाट झाली असून, काही घरांचे पत्रे उडाले, तर झाडे उन्मळून पडली. याचीच भीती नागरिकांनी घेतली असून, दुपारी तीननंतर घराबाहेर पडायलाही माणसे घाबरत आहेत.
दिवसभर प्रचंड उष्णता व सायंकाळी पावसाच्या सरी, या ऊन-पावसाच्या खेळाने थकवा, अंगदुखी, घशात खवखव आदी त्रास नागरिकांना जाणवू लागला आहे. या वातावरणाचा यात्रा हंगामाला देखील फटका बसला आहे. रोज सायंकाळी पाचनंतर दाटून येणार आभाळ व पडणाऱ्या पावसाच्या सरी, यामुळे यंदा उन्हाळा व पावसाळा एकाचवेळी सुरू आहे की खाय? अशा संभ्रमात शेतकरी सापडला आहे.