राजगुरूनगर : टोकावडे परिसरात गारांचा वर्षाव ; कांदा पिकाचे नुकसान
राजगुरूनगर: पुढारी वृत्तसेवा: खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील टोकावडे येथे शनिवारी(दि १५) दुपारी चार ते पाच दरम्यान वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. गारपिटीने उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. कांदा, भाजीपाला, तरकारी पिके भुईसपाट झाली.भर उन्हाळ्यात सिंचनाचा खर्च खांद्यावर घेत शेतकऱ्यांनी पिके जगवली. मात्र अवकाळी पावसाने क्षणार्धात होत्याचे नव्हते केले. भरत बाळकृष्ण गोपाळे यांनी तीन एकर क्षेत्रात कांद्याचे पीक घेतले होते.
काढणीला आलेल्या कांद्याच्या पातीवर गारांचा पाऊस पडला. पुर्ण नुकसान झाले.याशिवाय कांदा चाळीत,बटाट्याच्या अरणीत पाणी शिरल्याने परीसरातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. साठवण करून ठेवलेला चाऱ्यासह धान्य,कडधान्य आदींचा त्यात समावेश आहे.आदिवासी भागातील हे शेतकरी असुन नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.