मंचर : सावरकरांवर टीका करणार्‍यांनी पात्रता ओळखावी : शिवाजीराव आढळराव पाटील | पुढारी

मंचर : सावरकरांवर टीका करणार्‍यांनी पात्रता ओळखावी : शिवाजीराव आढळराव पाटील

मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : राहुल गांधी यांना देशाची आस्था नाही, त्यामुळे ते सावरकरांवर टीका करतात. सावरकरांवर टीका करणार्‍यांनी त्यांची पात्रता ओळखावी, अशी टीका माजी खासदार तथा शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. मंचर  येथे शिवसेना-भारतीय जनता पक्ष महायुतीच्या माध्यमातून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री राम मंदिर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक यादरम्यान आयोजित सावरकर गौरव यात्रेत ते बोलत होते.

या वेळी आमदार उमाताई खापरे, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात, संपर्कप्रमुख जयसिंगराव एरंडे, भाजप तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, स्वप्निल बेंडे पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार उमा खापरे म्हणाल्या की, भारतात राहणार्‍या प्रत्येक भारतीय नागरिकाला मी सावरकर असल्याचा अभिमान आहे. या वेळी हनुमान मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत निघालेल्या सावरकर यात्रेत शिवसेना-भाजप, बजरंग दल, दुर्गा वाहिनी पदाधिकारी, सावरकरप्रेमी उपस्थित होते. या वेळी वर्षा डहाळे यांचे भाषण झाले. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन विजय पवार यांनी केले. डॉ. ताराचंद कराळे यांनी आभार मानले.

Back to top button