अर्जुन खोपडे
भोर : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर ग्रामीण भागात 'नाद एकच, फक्त बैलगाडा शर्यत' अशी परिस्थिती झाली आहे. थोरामोठ्यांसह लहान मुलांनाही शर्यतीचे वेड लागले आहे. तरुणाई यातच गुंतून पडली असून, कामधंद्यांकडे दुर्लक्ष होत आहे. सध्याची तरुणाई कशाच्या मागे फिरेल याचा नेम नाही. कोरोना काळात घराबाहेर न पडलेला तरुण मोबाईलमध्ये गुंतला होता. तोच तरुण आता मोबाईलची मरगळ झटकून बैलांच्या मागे धावू लागला आहे. ग्रामीण भागात यात्रा-जत्रातून मोठ्या शर्यंतीचे आयोजन होत आहे.
भरघोस आकर्षक बक्षिसे असल्याने तरुणांचा बैलजोडी खरेदीकडे कल वाढला आहे. गावोगावातून बैलगाडा शर्यती वाढल्याने खिल्लार बैलाला मागणी वाढली आहे. लाखोंच्या घरात बैलांची किंमत झाली आहे .कर्जे काढून, जमीन विकून, वस्तू गहाण ठेवून तरुण स्वत: अथवा भागीदारीत बैल खरेदी करत आपला नाद पुरा करीत आहेत. हाच छंद पुरा करताना आर्थिक नुकसान किती होत आहे याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
बुजुर्गांच्या सल्ल्याला फाटा
शर्यतीसाठी बैलजोडी खरेदी करणे सोपे; परंतु त्यांचे संगोपन खूप अवघड आहे असे बुजुर्ग सांगत आहे. काही जण काम करून, कुटुंब सांभाळून बैल सांभाळत आहेत. परंतु त्यांचा उत्पन्नापेक्षा खर्चच जादा होत आहे. शर्यतींच्या मैदानात तरुणाची संख्या जास्त आहे. घरातून कामावर, कॉलेजला निघून गेलेला तरुण शर्यतीत मजा मारताना दिसत आहे. लहान मुलेही मोबाईलवर बैलगाडा शर्यतीचे व्हिडिओ पाहत आहेत.