पुणे : पुढारी वृत्तसेवा: शहरातील पुणे-नगर रस्ता, लोणीकंद आणि सोलापूर रस्त्यावरील बोरकरवस्ती भागात झालेल्या अपघातांत दोन पादचार्यांसह तिघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी लोणीकंद आणि लोणी काळभोर पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सोलापूर रस्त्यावरील बोरकरवस्ती भागात झालेल्या अपघातात वसंत ज्ञानोबा पोळ (वय 60, रा. बोरकरवस्ती) यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 27) सायंकाळी घडली. पोळ हे रस्ता क्रॉस करीत असताना त्यांना पुण्याहून थेऊरच्या दिशेने जाणार्या वाहनाने धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या पोळ यांचा मृत्यू झाला.
याबाबत अनिकेत वेताळ (वय 28) यांनी फिर्याद दिली आहे. लोणीकंद गावच्या हद्दीतून जाणार्या तुळापूर फाटा ते आळंदी रस्ता येथे रस्ता क्रॉस करताना पादचारी विनोदकुमार मेवालाल (वय 34, रा. लोणीकंद फाटा) यांचा अपघाती मृत्यू झाला. याबाबत रिंकू रामप्रसाद (वय 32) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 28) रात्री दहाच्या सुमारास घडली. मेवालाल हे लोणीकंद भागातील एका कंपनीत कामाला होते. मंगळवारी रात्री काम संपल्यानंतर ते तुळापर ते आळंदी या रस्त्यावरून पायी जात होते. या वेळी रस्ता क्रॉस करतानाच त्यांना भरधाव वाहनाने धडक दिली. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे पुढील तपास करीत आहेत. नगर रस्त्यावर घडलेल्या तिसर्या अपघातात दुचाकीस्वार गौरव रवींद्र कुमार यांचा मृत्यू झाला.
बुधवारी (दि. 29) सकाळी पावणेसातच्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावर ही घटना घडली. याबाबत सौरव कुमार (वय 18) याने फिर्याद दिली आहे. गौरव हा त्याचा साथीदार मोहित याच्यासह दुचाकीवरून नगर रस्त्यावरून जात होते. या वेळी भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात जखमी झालेल्या गौरवचा मृत्यू झाला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुहास पाटील करीत आहेत.