पिंपरी : केंद्र सरकारचे काउंटडाऊन सुरू; शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांची केंद्र सरकारवर टीका | पुढारी

पिंपरी : केंद्र सरकारचे काउंटडाऊन सुरू; शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांची केंद्र सरकारवर टीका

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे हा दिवस भारतीय लोकशाहीचा काळा दिवस म्हणून गणला जाईल. राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. त्यामुळे सरकारचे आता काउंटडाऊन सुरू झाले आह. अशी टीका पिंपरी- चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली.

पिंपरी येथे शहर काँगे्रसतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कैलास कदम बोलत होते. आंदोलनप्रसंगी ज्येष्ठ नेते मानव कांबळे, गौतम अरकडे, अभिमन्यू दहितुले, महिला शहराध्यक्ष सायली नढे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष माऊली मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले व मागासवर्गीय शहराध्यक्ष विजय ओव्हाळ आदी उपस्थित होते.

कदम म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा देशाची लोकशाही टिकवण्यासाठी बलिदान देऊन सक्षमपणे उभा असलेला पक्ष आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा सन्मान करून कायदा मानणारा पक्ष म्हणजे काँग्रेस होय. काँग्रेसला बलिदानाचा इतिहास आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्व दाबण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.

संसदेत केंद्र सरकारला विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी बेकायदा पद्धतीने राहुल गांधी यांचे खासदार पद संपुष्टात आणले. सुरत येथील कनिष्ठ न्यायालयाने सत्र न्यायालय व उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी मुदत दिली असताना देखील केंद्र सरकारने राहुल गांधी यांची खासदारकी तडका फडकी रद्द केली आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते विचलित होणार नाहीत, तर उलट केंद्र सरकारने शेतकरी, कामगार, बेरोजगारी, महागाई, खाजगीकरण, भांडवलदारांना पाठबळ या विषयी घेतलेले चुकीचे निर्णय उघडकीस आणून घरोघरी जाऊन नागरिकांचे प्रबोधन करतील.

देशात लोकशाही संपुष्टात आणून हुकुमशाही ची सुरुवात होण्याचे हे लक्षण आहे. केंद्र सरकारने ताबडतोब राहुल गांधी यांच्या खासदारकी विषयी घेतलेला निर्णय रद्द करावा अन्यथा काँग्रेस पक्ष देशभर रस्त्यावर उतरून जाब विचारेल असा इशारा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी पिंपरी येथे दिला.

Back to top button