प्रक्रिया न करताच दापोडीतून मैलासांडपाणी पवनानदी पात्रात
पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : दापोडी येथील 20 एमएलडी क्षमतेच्या मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्रात सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट पवनानदी पात्रात ते सोडण्यात येत आहे. या संदर्भात आम आदमी पार्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे तक्रार केली आहे. सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सांडपाणी सोडले जात आहे. असे प्रकार वारंवार घडत आहेत. नदी जलप्रदूषण वाढून जलचर जीवसृष्टी धोक्यात आली आहे.
या प्रकारास पालिकेचे अधिकारी तसेच, संबंधित ठेकेदार जबाबदार आहे. तसेच, त्या केंद्रावर सुरक्षेची साधणे न वापरता मैला उचलण्याचे काम केले जाते. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे रवीराज काळे, ऋषिकेश कानवटे, नीरज सुतार यांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.