पुणे : सहकारी बँकांना ताकद देण्याची गरज ; माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे मत | पुढारी

पुणे : सहकारी बँकांना ताकद देण्याची गरज ; माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे मत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : समाजातील लहान लहान सहकारी बँका, त्यांची क्षमता आणि धोरणे याचा विचार करून सहकारी बँकांना अधिक ताकद दिली, तर नवीन सक्षम समाजरचना तयार होण्यास मदत होईल, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी पुणे येथे व्यक्त केले. भगिनी निवेदिता सहकारी बँक सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या प्रारंभप्रसंगी गुरुवारी (दि.23) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी बँकेच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या मसुवर्णभरारीफ या विशेष ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉ.अजित रानडे, माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर, बँकेच्या अध्यक्षा डॉ. रेवती पैठणकर, उपाध्यक्ष दीपा दाढे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे आणि संचालक उपस्थित होते.

प्रभु म्हणाले, सध्याच्या काळात बँक आणि ग्राहक यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याची गरज आहे. पूर्वीच्या काळात हे संबंध अधिक दृढ होते, पण नवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्याने काही प्रमाणावर त्यावर परिणाम झाला आहे असे वाटते. विश्वास हा बँकाचा महत्त्वाचा घटक आहे. गुंतवणूक करणे हे बँकांचे कर्तव्य आहे. त्यावर ग्राहकांचा विश्वास असतो. हा विश्वास भगिनी निवेदिता बँकेने मिळविला आहे.
डॉ. रानडे म्हणाले, या बँकेचे शिस्तबद्ध व्यवस्थापन, कमी असणारे अनुत्पादक कर्जाचे (एनपीए) प्रमाण हे नक्कीच अतुलनीय असून, याचा सार्थ अभिमान आहे.

आज जागतिक पातळीवर बँकांमध्ये काही प्रमाणत अस्थिरता असली, तरी चांगले काम करणार्‍या बँकांच्या नामावलीत या बँकेचा समावेश करायला हवा. या बँकेतील संचालक, अधिकारी कर्मचारी हे विश्वस्त आहेत आणि वाढत्या अस्थिरतेला रोखण्याचे काम त्यांना करायचे आहे, असेही ते म्हणाले.

भाटकर यांनी मनोगतात बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. बँक अध्यक्षा पैठणकर यांनी प्रास्ताविकात बँकेच्या वाटचालीचा आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. उपाध्यक्ष दीपा दाढे यांनी आभार आणि विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले.आर. बी. आय. संचालक सतीश मराठे, सहकार आयुक्त अनिल कवडे तसेच बँकिंग विश्वातील पदाधिकारी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button