बांबू शेतीतून शाश्वत रोजगाराची संधी | पुढारी

बांबू शेतीतून शाश्वत रोजगाराची संधी

अर्जुन खोपडे : 

भोर : भोर तालुक्याच्या पश्चिम भागात भात हे मुख्य पीक असले तरी बांबू शेतीदेखील तितकीच महत्त्वाची आहे. या भागात बांबूसाठी पोषक जमीन व वातावरण असल्याने बांबूची वाढ चांगली होते. हमखास उत्पन्न मिळत असल्याने अनेक शेतकरी बांबू लागवडीकडे वळले आहेत. त्यामुळे या भागात शासनाने बांबू विकास प्रकल्प उभारावा. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल, अशी मागणी होत आहे.
म्हसर, महुडे, वेळवंड, मळे, भुतोंडे या डोंगराळ भागातील गावात बांबूची बेटे मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहेत.

नीरा देवघर व भाटघर धरणाखाली मोठ्याप्रमाणात जमिनी गेल्याने तसेच रोजगाराचे पर्यायी साधन नसल्याने येथील नागरिकांना रोजगारासाठी पुणे, मुंबई, कोकणात जावे लागते. या स्थितीत बांबूमुळे बदल होऊ शकतो. या भागातील शेतकरी आता बांबू शेतीकडे वळले आहेत. सदर बांबू व्यापार्‍याला विकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. योग्य भाव मिळत नसल्यामुळे ज्या ठिकाणी बांबूची शेती आहे अशा ठिकाणी शासनाने बांबू विकास प्रकल्प उभारावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. असा प्रकल्प झाल्यास बांबूला चांगला भाव मिळण्याबरोबरच युवकांना रोजगार मिळू शकेल.

यासाठी प्रशासन, राजकीय नेतेमंडळींनी बांबू शेतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. बांबू ही जलदगतीने वाढणारी, सदाहरित, दीर्घायू वनोपज आहे. याचे जीवनचक्र 40 ते 100 वर्षे असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नसते. कमी-जास्त पाऊस झाला तरी नुकसान होत नाही. डोंगरउतारावरील जमिनीवरही बांबूची लागवड करता येते, त्यामुळे लागवड केल्यानंतर थोडी काळजी घेतल्यास खात्रीशीर उत्पन्न मिळू शकते.

शेती, हस्तकला, बांधकाम, फर्निचर, विविध वस्तू, कागद उद्योग, वाद्य निर्मिती आणि खाद्य इत्यादीसाठी बांबूचा वापर केला जातो. तालुक्यात बांबूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळेच तालुक्याच्या पश्चिम भागात बांबू प्रकल्प स्थापन करावा, अशी मागणी होत आहे.

Back to top button