पुणे : शिरूरमधील बंधार्याला छिद्र पडल्याने समस्या

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर शहराची जीवनदायिनी असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-याला वरील भागाला छिद्र पडल्याने त्यावरून वाहतूक करणा-या दुचाकीवाहनांचा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. छिद्रामुळे बंधा-यालाही धोका निर्माण झाला आहे. साधारणत: तीस वर्षांपूर्वी शिरूर शहराला पाणीटंचाई जाणवत होती. दुष्काळी भाग म्हणून शिरूरची ओळख होती. शहराचा पाणीप्रश्न कायमचा सुटावा, युती शासनाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व पालकमंत्री शशिकांत सुतार यांच्या माध्यमातून तत्कालीन उपनगराध्यक्ष नेमिचंद फुलपगर यांच्या प्रयत्नातून हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा 1997 मध्ये बांधला.
त्यानंतर शहराचा पाणीप्रश्न मिटला. नदीपलीकडील नगर जिल्ह्याच्या अनेक गावांतील नागरिक या बंधा-यावरून दुचाकीवालन प्रवास काल लागले. वेळ तसेच अंतर वाचवण्यासाठी या बंधा-यावरील वाहतूक वाढली. आज बंधारा बांधून 26 वर्षे झाली. मात्र, त्याची कुठल्याही प्रकारची डागडुजी नाही.
शिरूर शहराला पाणीपुरवठा करणार्या कोल्हापूर बंधार्याला छिद्राबाबत बांधकाम विभागाकडे प्रस्ताव दिला आहे. कामासाठी तरतूद केली असून, लवकरच या ठिकाणी काम केले जाईल.
– राजश्री मोरे, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग