पुणे : आला उन्हाळा, तब्येत सांभाळा
पुणे : एप्रिल-मे महिन्यांतील उकाडा यंदा मार्च महिन्यापासूनच जाणवू लागला आहे. दुपारच्या वेळी सूर्य डोक्यावर आलेला असताना तब्येतीवरही परिणाम होत असल्याचे दिसत आहे. डोकेदुखी, पित्त, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, थकवा येणे, नाकातून रक्त येणे, चक्कर येणे अशी लक्षणे जाणवत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
कोणते आजार उद्भवतात?
उष्माघात
त्वचाविकार
डोळ्यांचे आजार
बुरशीजन्य संसर्ग
डिहायड्रेशन
मूत्रपिंडाचे आजार
काय काळजी घ्यावी?
दिवसभर भरपूर पाणी प्यावे. आहारात द्रवपदार्थांचा समावेश करावा.
शीतपेयांऐवजी फळांचा रस, ताक, कोकम सरबत अशा पेयांचे सेवन करावे.
उन्हात घराबाहेर पडताना डोके आणि चेहरा स्कार्फने, रुमालाने झाकून घ्यावा.
त्वचेची संवेदनशीलता जपण्यासाठी घराबाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर अवश्य करा.
घट्ट तसेच काळे कपडे घालणे टाळावे. उन्हाळ्यात सुती कपडे घालावेत.
गरज नसताना दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडू नये. विशेषत: लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी काळजी घ्यावी. कामासाठी बाहेर पडताना डोके, चेहरा पूर्णपणे झाकलेला असेल, याची काळजी घ्यावी. पाण्याची बाटली सोबत ठेवावी. तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ टाळून द्रवपदार्थांवर भर द्यावा. त्वचा, कान, डोळे, नाक यांची जास्त काळजी घ्यावी.
– डॉ. अनिल साळुंखे, जनरल फिजिशियन