

पुणे, पुढारी वृत्तसेवा: जगात सर्वाधिक वेगाने विकसित होणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. 2014 मध्ये नाजूक अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट असलेल्या भारताचा आता जगातील आघाडीच्या पाच अर्थव्यवस्था असलेल्या देशात समावेश झाला आहे. देशात पंतप्रधान मोदी सरकार आल्यापासून आत्तापर्यंत 77 हजार स्टार्टअप्स सुरू झाले आहेत. स्टार्टअप्समध्ये जगात तिसर्या क्रमांकावर पोहोचलो आहोत, अशी माहिती केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारण मंत्री, अनुराग सिंग ठाकूर यांनी दिली.
केंद्र सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहयोगाने शनिवारी सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित चौथ्या वाय-20 परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ठाकूर बोलत होते. यावेळी डॉ.संदीप वासलेकर, सिंबायोसिसचे अध्यक्ष डाॅ.शां.ब.मुजुमदार, सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ.विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.
जी- 20 चे यजमानपद भूषवणे हा आपला मोठा सन्मान आहे. यामुळे जगातील युवा वर्गाला सर्वाधिक भेडसावत असलेल्या समस्यांबाबत एकत्रित प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या परिषदेत केवळ भाषण करण्यापुरती भारताची भूमिका मर्यादित नाही, तर युवा वर्गाचे म्हणणे ऐकले जावे आणि त्यानुसार जागतिक जाहीरनाम्याची निर्मिती सक्रियपणे व्हावी, असा देखील या बैठकीचा उद्देश आहे. वाय-20 परिषदेने पाच प्रमुख संकल्पना निश्चित केल्या आहेत, ज्या आपल्या युवा वर्गासाठी मार्गदर्शक म्हणून काम करतील, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला.