आयुष्याची संध्याकाळ त्रासदायकच..! ज्येष्ठांच्या वाट्याला शारीरिक, मानसिक त्रासासह मालमत्तेचा वाद
महेंद्र कांबळे
पुणे : आई-वडिलांची प्रॉपर्टी ही माझीच प्रॉपर्टी आहे, या जोरावर त्यांच्याकडून ती हिसकावून कशी घ्यायची, त्यांना कमजोर कसे करायचे, याची असंख्य उदाहरणे समोर आली आहेत. प्रॉपर्टीसाठी मुलगा, सुनांकडून ज्येष्ठ नागरिकांना त्रास दिला जातो. त्यांना कुटुंबाचा भागच मानले जात नसल्याचे वास्तव न्यायालयात ज्येष्ठ नागरिकांनी दाखल केलेल्या खटल्यांवरून तसेच पुणे पोलिसांच्या भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारींवरून समोर आले आहे. मागील तीन वर्षांत 1 हजार 568 तक्रारी भरोसा सेलच्या ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे आल्या आहेत.
तर पुण्यातील न्यायालयांमध्ये तब्बल 36 हजार 630 ज्येष्ठ नागरिकांची प्रकरणे दाखल आहेत. त्यामध्ये प्रॉपर्टी संदर्भातील 28 हजार 451 दिवाणी, तर 8 हजार 179 फौजदारी प्रकरणे प्रलंबित आहेत. यावरून आयुष्याची संध्याकाळ ज्येष्ठ नागरिकांसाठी त्रासदायकच ठरत आहे. ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे यासंदर्भात भरोसा सेलकडे मागील वर्षात 431 तक्रारी आल्या होत्या.
त्यातील 404 तक्रारींचा निपटारा झाला परंतु, ज्यामध्ये अंतिमतः मार्ग निघाला नाही अशा 18 तक्रारी पुढील कार्यवाहीसाठी पोलिस ठाण्याकडे पाठविण्यात आल्या आहेत. मालमत्तेवरून होणार्या त्रासाबाबत 63 आणि फसवणुकीबाबतच्या 47 तसेच इतर 83 तक्रारी ज्येष्ठ नागरिक कक्षाला मागील वर्षात प्राप्त झाल्या. ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक व मानसिक त्रास देणार्यामध्ये घरातील व नातेवाईकांचीच संख्या सर्वाधिक आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार, नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेलच्या निरीक्षक अनिता मोरे, ज्येष्ठ नागरिक कक्षातील सहायक पोलिस निरीक्षक योगिता बोडखे आणि सहायक पोलिस फौजदार आशा गायकवाड आणि कर्मचारी सध्या ज्येष्ठ नागरिक कक्षाचे काम पाहत आहेत.
प्रॉपर्टीचा वाद कारणीभूत
अनेकदा प्रॉपर्टीच्या वादातून ज्येष्ठांना त्रास दिला जातो. जोपर्यंत घरातील ज्येष्ठांकडून पेन्शन, त्यांच्याकडील पैसा मिळत असतो, तोपर्यंत त्यांचा व्यवस्थित सांभाळ केला जातो. मात्र, काही कालावधीत त्यांच्याकडील प्रॉपर्टी एकदा नावावर करून घेतली की, त्यांचा सांभाळ केला जात नाही. ज्येष्ठ नागरिकाने आयुष्यभर घर चालविलेले असते, त्यांच्याकडे आयुष्याचा अनुभव असतो. कुटुंबातील निर्णयामध्ये त्यांना सामावून घेतले पाहिजे. कधी- कधी पालकांची पण चूक दिसते. आयुष्यभर घर चालविल्यामुळे त्यांच्या मर्जीप्रमाणे घर चालविण्याचा आग्रह असल्याचे पाहायला मिळते. मुले त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे वागू देत नाहीत असे दिसते.
- पुण्यातील न्यायालयांत ज्येष्ठांचे 36630 दावे प्रलंबित
- भरोसा सेलकडे तीन वर्षांत 1568 तक्रारी
अशा वाढताहेत तक्रारी
वर्ष प्राप्त अर्ज प्रलंबित तक्रारी निपटारा
2020 362 362 000
2021 582 582 000
2022 624 584 040