मीच कुठेतरी कमी पडलो, विनम्रपणे निकाल स्वीकारतो; पराभवानंतर भाजपाच्या हेमंत रासनेंची प्रतिक्रिया | पुढारी

मीच कुठेतरी कमी पडलो, विनम्रपणे निकाल स्वीकारतो; पराभवानंतर भाजपाच्या हेमंत रासनेंची प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन : पुण्यातल्या कसबा पेठ मतदारसंघात महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. भाजपाचे हेमंत रासने यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यानंतर हेमंत रासने यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मी उमेदवार म्हणून कमी पडलो, हे मला मान्य आहे. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला. आता माझ्या मनात मी कमी पडल्याची भावना आहे, असं भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी म्हटलं आहे. तसेच अद्याप माझं वरिष्ठांशी कोणतंही बोलणं झालेलं नाही. कसबा पेठ हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जात होता. मुक्ता टिळक या मतसंघाच्या आमदार होत्या. त्यांचं निधन झाल्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक पार पडली. टिळक कुटुंबातील सदस्याला तिकिट देण्याऐवजी भाजपाने हेमंत रासनेंना तिकिट दिलं होतं.

२००९ पासून जर आपण पाहिलं तर या मतदारसंघात तिरंगी लढत होत होती. जेव्हा गिरीश बापट जिंकून आले, तेव्हा त्यांना ५४ हजार मतं मिळाली होती. ९२ हजार मतं तेव्हाही विरोधी पक्षाला पडली होती. जो निकाल समोर आलायं, त्याचं मला आत्मचिंतन करावं लागेल आणि मी कुठे कमी पडलो हे मला शोधावं लागेल. राज्यात आमची सत्ता आहे म्हणून आमचे मंत्री दिसतात. मात्र, विरोधी उमेदवाराच्या प्रचारासाठीही अनेक दिग्गज नेते आलेच होते. मी बुथवाईज सर्व आकडेवारी पाहणार आहे. जिथे आम्ही कमी पडलो तिथे आम्ही पुढच्या वेळी चांगलं काम करू, असं हेमंत रासने यांनी म्हटलं आहे.

कार्यकर्त्यांशी, त्या भागातल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करता येईल. प्रचारादरम्यान मी घरोघरी जाऊ शकत नव्हतो, पण पक्षाची यंत्रणा घरोघरी गेली होती. आमच्या अपेक्षेप्रमाणे हे घडलेलं नाही. नाराजीचा फार फरक पडला असं मला वाटत नाही. मी कुठेतरी कमी पडलो, असं मला वाटतं. मला यावर थोडं चिंतन करावं लागेल. माझ्या दृष्टीने हा निकाल धक्कादायक आहे. मला विजयाची खात्री होती.

मागच्या पाच टर्म टिळक बापट यांच्या पाठिशी असलेले मतदार हे तुमच्या पाठिशी उभे राहिले का नाहीत? असं विचारलं असता हेमंत रासने म्हणाले, याबाबत मला माहिती घ्यावी लागेल. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला. पण मी उमेदवार म्हणून मी कमी पडलो असं मला म्हणायचं आहे. मला भाजपने अधिकृत उमेदवारी दिली. त्यामुळे जिंकून येणं ही माझीच जबाबदारी होती, मात्र त्यात मी कमी पडलो असं हेमंत रासने यांनी म्हटलं आहे. तसंच तुम्ही कितीही प्रश्न विचारले तरीही मी उमेदवार म्हणून कमी पडलो हेच मी सांगणार आहे.

Back to top button