पुणे : कसबा, चिंचवड निकालाची ग्रामीण भागातही प्रचंड उत्सुकता | पुढारी

पुणे : कसबा, चिंचवड निकालाची ग्रामीण भागातही प्रचंड उत्सुकता

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा  : गेल्या काही महिन्यात राज्यात सत्ताबदल होताना झालेला नेतृत्व बदल व पक्षीय संघर्ष सर्वज्ञात आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणूक झाली असून त्याकडे राज्याचे लक्ष केंद्रित झाले होते. अनेक भूकंप घडल्यानंतर सध्याचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि भविष्यातील वर्चस्व अबाधित ठेऊन वाढवण्यासाठी घटक पक्षांच्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय महत्त्वाची घडामोड ठरली आहे. राजकीय उलथापालथ करणाऱ्या सर्व घडामोडी ताज्या असताना त्या पार्श्वभूमीवर पुण्यात पहिल्यांदा होत असलेल्या कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत कुणाची बाजी लागणार याकडे खेड,आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. निकालाबाबत अंदाज व्यक्त करताना होणाऱ्या चर्चाना उधाण आले आहे.

अनपेक्षित राजकीय उलथापालथ होऊन राज्यात सत्ताबदल झाला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडुन शिवसेना नाव व धनुष्य बाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आले. राज्यात महाविकास आघाडी खिळखिळी करण्यासाठी भाजपने शिंदे गटाला साथ दिली. या पोटनिवडणुकीत केंद्रीय तसेच राज्यातील अनेक महत्त्वाचे नेते प्रचारात सहभागी झाले. काही तर पुण्यात तळ ठोकून होते. साम, दाम, दंड आणि भेद याचा वापर करून झालेल्या निवडणुकीत उमेदवारापेक्षा कोणत्या पक्षाचा विजय होणार याकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागुन आहे. इथे लागणाऱ्या निकालाचे पडसाद, परिणाम भविष्यात होणाऱ्या अनेक निवडणुकीवर होणार आहेत.

मुदत संपुन वर्ष लोटले तरी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाहीत. परिणामी खेडोपाडी अत्यंत गरजेची विकास कामे प्रलंबित आहेत. उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. शेती उत्पादनाला बाजारभाव नाही, दिवसा वीज पुरवठा होत नाही; मात्र विजेचे बिल शेतकऱ्यांना सक्तीने भरावे लागत आहे. प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या मार्फत प्रशासन चालवुन सरकारने लोकप्रतिनिधीचा हस्तक्षेप दुर ठेवला आहे. ग्रामपंचायत, सहकारी सोसायटीच्या निवडणुका घेऊन शासनाने गावागावात वाद उभे केले आहेत. विधानसभा पोटनिवडणुक मात्र तातडीने घेतली जात आहे. स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांना सोयीचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असुन त्यादृष्टीने उद्याचा निकाल महत्वाचा आहे, अशा चर्चाना गावोगावी उधाण आले आहे.

Back to top button