भिगवणजवळ कारचा भीषण अपघात, तीघांचा जागीच मृत्यू; मृतात आई, मुलाचा समावेश
इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर १ येथे स्वीफ्ट कारचा भिषण अपघात झाला. या कार अपघातात कार चालकासह ३ व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. संदीप राजाभाऊ माळी (वय ३५), बालाजी केरबा तिडके (वय ४८) आणि श्रीमती सरस्वती राजाभाऊ माळी (वय ६१) अशी मृतांची नांवे असून हे तिघेही लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २४) पहाटे पावणेचार वाजताच्या दरम्यान पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर -पुणे या लेनवर इंदापूर तालुक्यातील डाळज नं.१ गावाच्या हद्दीत चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि पुण्याच्या दिशेने येणारी कार (एमएच ४३ बीएन १४०२) भिगवण बसस्थानकापासून जवळच उतारावर पलटी झाली. यात कारमधील चालक व त्याची आई आणि अन्य एक जागीच मृत पावले. तर चंद्रकांत रामकिशन गवळी (वय ५४, रा. ज्योती नगर लातूर) हा किरकोळ जखमी झाला.