...तर फडणवीसांना भाजप मुख्यमंत्री का करू शकले नाहीत ? खा. सुळे यांचा सवाल | पुढारी

...तर फडणवीसांना भाजप मुख्यमंत्री का करू शकले नाहीत ? खा. सुळे यांचा सवाल

बारामती; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपशी युती हवी होती. मात्र मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस नको होते, असे वक्तव्य भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केले होते. या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे १०५ आमदार निवडून आले असताना फडवणीस यांना मुख्यमंत्री का केले नाही? असा सवाल त्यांनी केला. ४० आमदार असणाऱ्या गटाला मुख्ममंत्रीपद देत भाजपने फडणवीस यांचा अपमान केला असल्याचे त्या म्हणाल्या.

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यावर काय बोलणार हे स्पष्ट करताना खा. सुळे म्हणाल्या, भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष चालवण्याची ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ताकद असल्याचे यातून दिसून आले आहे. बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. भाजप प्रदेशाध्य़क्षांच्या म्हणण्यानुसार, १०५ आमदार असलेला राष्ट्रीय पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष पवार चालवतात, एवढी त्यांची ताकद आहे. हे कबुल केल्याबद्दल मी भाजप प्रदेशाध्यक्षांचे आभार मानते, अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

महाराष्ट्राच्या विरोधात एक मोठे षडयंत्र

महागाई, बेरोजगारी वाढली सिलेंडरचा भाव महाग झाला आहे. कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी रस्त्यावर आला आहे. महागाई, बेरोजगारी आहे. सर्वसामान्यांना दोन वेळचे जेवण मिळत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे इतिहासात जाण्यात अर्थ नाही. इतिहासाचा अभ्यास कधीही करता येईल, पण आकडोंसे पेट नही भरता, जब भूख लगती है तो धान लगता आहे, हे सुषमा स्वराज यांचे वाक्य मला आठवतेय असे त्या म्हणाल्या. ज्या पद्धतीने सत्तेचा संघर्ष झाला, ज्या पद्धतीने दिल्लीच्या पक्षाने शिवसेना संपविण्याचा घाट घातला, यातून तुम्ही काय ते बघा. महाराष्ट्राच्या विरोधात एक मोठे षडयंत्र केंद्र करतेय, असे सुळे म्हणाल्या.

मी वास्तवतेत जगते, इतिहासात नाही

मराठी अस्मितेला धक्का पोहोचविणे, महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राच्या विरोधातील षडयंत्र हे दिल्लीतून होतेय. त्यातून पहाटेच्या शपथविधीचा वारंवार उल्लेख होतो आहे. तो शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली नसती असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, परंतु त्यांच्या वक्तव्यातून त्यांना या शपथविधीची कल्पना होती का, हे सांगता येत नाही, मी वास्तवतेत जगते, इतिहासात नाही, असे त्या म्हणाल्या.

सध्याचे सरकार असंवेदनशील

इडी सरकार स्वतःची खुर्ची वाचविण्यात व्यस्त असून ते असंवेदनशील सरकार आहे. त्यांना सर्वसामान्यांचे काहीही देणेघेणे उरलेले नाही. अंगणवाडी सेविकांच्या वेदना त्यांना दिसत नाही.

बाळासाहेबांनीच उत्तराधिकारी निश्चित केला

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी निश्चित केला होता. त्या बैठकीला राज ठाकरे यांच्यासह अन्य नेते हजर होते. राज ठाकरे यांनी मतभेद झाल्यावर स्वतःचा वेगळा पक्ष काढला. ते चिन्ह, पक्ष ओरबाडत बसले नाहीत. तशी संधी यांनाही होती. परंतु एका मराठी माणसाने काढलेला पक्ष दिल्लीच्या तख्ताला सहन होत नसेल त्यातून हे घडले आहे. परंतु अखेर सत्याचा विजय होईल असे सुळे म्हणाल्या.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री इलेक्शन मोडमध्ये

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री २४ तास इलेक्शन मोडमध्ये आहेत. राज्यात एमपीएससी परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. शिक्षक आंदोलन करत आहेत. एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. अंगणवाडी सेविकांचे प्रश्न आहेत. परंतु हे लोक निवडणूक आयोग, न्यायालय यासाठी व स्वतःची खुर्ची, स्वतःची सत्ता, वाचविण्यासाठी वेळ खर्ची घालत आहेत, असे खासदार सुळे म्हणाल्या.

Back to top button