पुणे : मला पनौतीदेखील म्हटले गेले..! प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन | पुढारी

पुणे : मला पनौतीदेखील म्हटले गेले..! प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘एका चित्रपटासाठी ऑडिशन देताना ‘चक्रम ’ या मल्याळम् सिनेमासाठी माझी निवड झाली. त्यामध्ये मोहनलाल यांच्यासोबत मी काम करणार होते. पण, काही कारणाने तो सिनेमा रद्द झाला. त्यानंतर तब्बल 12 मल्याळम् सिनेमांतून मला काढून टाकण्यात आले. हे सर्व घडले ते 3 वर्षांच्या काळात. त्या वेळी मला ‘पनौती’देखील म्हटले जायचे, अनेक निर्माते मला चित्रपटात घेण्यासाठी संकोच करायचे,’ अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांनी आपला चित्रपटसृष्टीतील संघर्षाचा काळ बोलका केला.

पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत विद्या बालन यांनी ‘चॅलेंजेस ऑफ फिमेल अ‍ॅक्टर्स इन दी एन्टरटेन्मेट वर्ल्ड’ या विषयावर मनमोकळा संवाद साधला. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ‘मी 8 वर्षांची होते, त्या वेळी माधुरी दीक्षित यांना ‘एक, दो, तीन…’ या गाण्यात पाहिले आणि तिथून मला त्यांच्यासारखे बनण्याची खूप इच्छा झाली होती आणि मी अभिनय करण्याचे ठरवले,’ असे विद्या यांनी सांगितले.

‘माझे करिअर बंद झाले, असेही वाटले. तो अतिशय संघर्षाचा काळ होता. पुढे युफोरिया म्युझिक व्हिडिओने चित्र बदलले, त्यानंतर परिणीता, इश्किया, कहानी, डर्टी पिक्चर असे अनेक चांगले चित्रपट मला मिळाले,’ असेही बालन यांनी सांगितले. विद्या बालन म्हणाल्या, ‘महिलाकेंद्री चित्रपट मोठ्या पडद्यावर चालतील की नाही, याबाबत अजूनही निर्माते साशंक असतात.

अशा वेळी तो चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करणे, हा त्यांना अधिक सुरक्षित पर्याय वाटतो. त्यामुळेच महिला केंद्री चित्रपट हे ओटीटीवर प्रदर्शित करण्यावर अधिक प्राधान्य दिले जात आहे. मोठ्या पडद्यावर असे चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत अजूनही अनेकांच्या मनात संकोच असतो. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. कलाकारांनी राजकीय वक्तव्ये का करावी? चित्रपट, कलाकार हे तुमचे मनोरंजन करण्यासाठी आहेत, राजकीय वक्तव्ये करण्याचे काम राजकारण्यांनी करावे,’ असेही त्यांनी सांगितले.

Back to top button