शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवणुकीसाठी राज्य व केंद्र सरकार पाठीशी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही | पुढारी

शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवणुकीसाठी राज्य व केंद्र सरकार पाठीशी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

पुणे, पुढारी वृत्तसेवा: इथेनॉलचा वापरामुळे साखर कारखान्यांना नवसंजिवनी मिळत असून 106 कारखान्यांकडून इथेनॉल निर्मिती होत आहे. ऊस पिकासह कापूस, सोयाबीन आणि इतर फळपिकांच्या उत्पन्न वाढीबाबत राज्यातील शेतकरी अग्रेसर राहावा आणि त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्य आणि केंद्र सरकार खंबीरपणे पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.

मांजरी येथे शनिवारी (दि.21) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46 वी वार्षिक सर्वसाधारण (व्हीएसआय) सभा झाली. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी व्हीएसआयचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार सतेज पाटील, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर, राजेश टोपे, विशाल पाटील, दिलीप देशमुख, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, विश्वजित कदम, बाळासाहेब पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व्हीएसआयच्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये राज्यात मानाचा असलेला कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार सांगली-कडेगांव येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास देण्यात आला. रक्कम रुपये 2 लाख 51 हजार, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार सांगली-कडेगांव येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास देण्यात आला.

कै. विलासरावजी देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार हा कोल्हापूर-कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास देण्यात आला. रक्कम रुपये एक लाख, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कै.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार यंदा दोन साखर कारखान्यांना विभागून देण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर प्रा.लि. आणि सोलापूरमधील श्री पांडूरंग सहकारी साखर कारखाना (शिरपूर,ता.माळशिरस) या कारखान्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रत्येकी रक्कम रुपये 50 हजार, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

कै. विलासरावजी देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार हा कोल्हापूर-कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास देण्यात आला.

कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार (2020-21 करिता) कडेगांव-सांगली येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास देण्यात आला. रक्कम रुपये एक लाख, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. किसन.महादेव उर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार सांगली जिल्ह्यातील क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यास (कुंडल,ता.पलूस) देण्यात आला. रक्कम रुपये एक लाख, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

कै. किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार सांगली जिल्ह्यातील क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यास (कुंडल,ता.पलूस) देण्यात आला.

रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवणी पुरस्कार कराड-सातारा येथील जयवंत शुगर्स लिमिटेड या कारखान्यास देण्यात आला. रक्कम रुपये एक लाख, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. साखर कारखान्यांचे संचालक मंडळ, अधिकारी आणि शेतकर्‍यांनी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्विकारले. यावेळी अन्य पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचा नावलौकिक देशातच नव्हे तर परदेशातही असून ऊस शेती, साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी संस्थेकडून होत असलेल्या कामाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. ऊस उत्पादकांसह सर्व शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. तसेच साखर उद्योगाच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत केली जाईल. ऊस तोडणीसाठी मजुरांच्या असलेल्या टंचाईवर केंद्र व राज्यांच्या मदतीतून लवकरच 900 ऊस तोडणी यंत्रांसाठी आर्थिक मदत केली जात आहे. कृषी क्षेत्रात पारंपरिक शेतीबरोबर अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती केली जात आहे. त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवर साखर उत्पादनाचा विचार केला तर भारत, ब्राझिल आणि त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. देशाच्या ग्रामीण भागाच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रथमच केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना झाली. आम्ही महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला मदतीची आवश्यकता असल्याची चर्चा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यांशी केली असून राज्याबरोबरच केंद्र सरकारही आपल्या राज्याच्या मागे खंबीरपणे आणि सकारात्मक दृष्टिने मदत करील, असा आम्हाला विश्वास आहे.

राज्य सरकारने 18 सिंचन प्रकल्प मार्गी लावले असून मोठे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. जलयुक्त शिवार योजनाही पुन्हा सुरु करण्यात आलेली आहे. पीक कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर लाभापोटी 7 लाख 19 हजार शेतकर्‍यांना अडीच हजार कोटी रुपये दिले आहेत. तसेच पुढच्या टप्प्यातही 7.20 लाख शेतकर्‍यांना सुमारे सतराशे कोटी रुपयांचे वाटप होत असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडून व्हीएसआयसह शरद पवार यांचेही कौतुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हीएसआय संस्थेसह माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या कार्याचाही गौरव केला. सहकार क्षेत्रात शरद पवार यांचे योगदान आहे. त्यांनी कायम मार्गदर्शन केल्यास त्याचा कृषि व सहकार क्षेत्राला आणि राज्यालाही फायदाच होईल. संशोधन, विकास, प्रशिक्षण आणि विस्तार हे व्हीएसआयचे उद्दिष्ट असून या बाबत संस्थेकडून होत असलेल्या कामामुळे सहकार क्षेत्राला फायदा होत असल्याचे ते म्हणाले.

Back to top button