पुणे : भारतात जूननंतर आर्थिक मंदीची शक्यता : नारायण राणे | पुढारी

पुणे : भारतात जूननंतर आर्थिक मंदीची शक्यता : नारायण राणे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जागतिक नाणेनिधीच्या अहवालानुसार जगभरात आर्थिक मंदी येऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतात जूननंतर आर्थिक मंदी येण्याची शक्यता आहे. मात्र, नागरिकांना आणि पर्यायाने देशाला मंदीची झळ पोहोचू नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नियोजन केले जात आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली. पुण्यात सोमवारी जी 20 परिषदेचे उदघाटन नारायण राणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. उद्योगांमधील गुंतवणूक, पायाभूत सुविधा, रोजगार अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.
राणे म्हणाले, ‘जगातील 20 देशांचा परिषदेत समावेश आहे. या माध्यमातून भारत प्रगतशील देशाच्या दिशेने वाटचाल करत आहे. 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून, मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाकडे वाटचाल करत आहे. मोदी हे बोलतात ते करून दाखवतात.’
देशातील 50 टक्के लोकसंख्या शहरात आहे. त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने जी 20 परिषदेला महत्व आहे. पुण्याने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. पुण्याचा विकास, गुणवत्ता यांचा अनुभव परदेशी पाहुण्यांना येईल. भारताच्या प्रगतीची झलक त्यातून दिसेल.’
महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात आहेत, असे चित्र निर्माण करून केवळ राजकारण केले जात आहे. प्रत्यक्षातील स्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रात अनेक सोयी, सुविधा उपलब्ध असल्याने अनेक उद्योजक महाराष्ट्राला महत्व देतात. भविष्यात राज्यात अनेक उद्योग येतील, असेही राणे म्हणाले. राज्यात सरकार बदलले की औद्योगिक धोरण बदलते, या आरोपात तथ्य नसल्याचेही ते म्हणाले.

Back to top button