पुणे : विरोधकांकडून सरकार पाडण्याच्या वल्गना ; खा. संजय राऊत यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
दौंड/राहू : पुढारी वृत्तसेवा : आमदार, खासदार सोडून जाण्याच्या भीतीने सरकार पडण्याच्या वल्गना खा. संजय राऊत करतात. जेलमध्ये राहून आल्यापासून त्यांची भाषाही तशीच झाली आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केली. ते दौंड कृषी महोत्सव 2023 च्या उद्घाटन प्रसंगी पत्रकारांशी बोलत होते. कृषी प्रदर्शनाला भेट देणार्या शेतकर्यांकडून पैसे घेणार्यांवर नाव न घेता अप्रत्यक्ष टीका या वेळी बावनकुळे यांनी केली. केंद्राच्या शेती संदर्भातील 49 योजनांमधील 12 योजना प्रत्यक्ष शेतकर्यांना लाभ मिळवून देतात. विकास केला, अशा वल्गना करणाऱ्यांनी 50 वर्षे सत्ता उपभोगली.
त्यांनी कोणावर उपकार केले नाहीत. सत्ता हे साध्य नसून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचे भलं करण्याचं साधन आहे. सत्तेचा वापर कंत्राटदारांसाठी झाला. एकट्या बारामतीचा विकास म्हणजे संपूर्ण मतदारसंघाचा विकास होत नसल्याचे परखड मत या वेळी बावनकुळे यांनी व्यक्त केले. समाजातील एकाचे अश्रू पुसता आले तरी मोठं काम झालं असं मी समजतो. मागचे 15 वर्षे सत्ता उपभोगली. त्यांना पुण्यात पूल बांधण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना टि्वटच्या माध्यमातून सांगावं लागतंय, मग तुम्ही काय केलं अशी टीका बावनकुळे यांनी नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केली. विकासाचा भ्रम निर्माण केला जातोय. 7 हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यात 4 हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायती भाजप व मित्रपक्षांच्या निवडून आल्या आहेत, असे बावनकुळे म्हणाले.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील या वेळी म्हणाले, शेतकरी जगला पाहिजे, स्वावलंबी झाला पाहिजे. जे शेतकर्यांना वेळ देत नव्हते ते आता वाड्या-वस्त्यांपर्यंत शेतकर्यांकडे फिरत आहेत. बारामती कोणाला आंदण दिले नाही.
पंतप्रधान मोदी यांच्या विकास प्रवाहात बारामतीचे शेतकरी आणि नागरिक सामील होणार आहेत, असे पाटील म्हणाले, संदीप जगताप या शेतकर्याने शासनाच्या योजनेसंदर्भात आपले मत व्यक्त केले. प्रास्ताविक वासुदेव काळे यांनी केले. विक्रांत पाटील, विजय चौधरी, गणेश भेगडे, बाबाराजे जाधव, राहुल शेवाळे, दादा फराटे, जालिंदर कामठे, माउली शेळके इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
प्रतिभावंत शेतकरी, उत्पादकांचा सत्कार
कार्यक्रमावेळी सेंद्रीय शेती करणारे कांतिलाल रणदिवे यांच्यासह महेश फरगडे, गणेश फरगडे, उषा काळे यांनी फार्म प्रोड्युसर कंपनी स्थापन करून विक्री व्यवस्था उभारणे, दत्तात्रय जठार यांनी उसापासून विविध प्रकारची उत्पादने तयार करणे, सचिन चंद्रकांत थोरात यांनी डेअरी व्यवसायात स्वतःच ब—ँडिंग करून विक्री करणे, शेखर आणि दीपक शितोळे यांनी देशी कुक्कुटपालन व्यवसायात उत्पादन व विक्री करून प्रगती साधल्याने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना कृषी उद्योजगता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.