‘भूमिकांमुळे कलाकारांना समृद्धीची प्राप्ती’ : अभिनेते सयाजी शिंदे | पुढारी

‘भूमिकांमुळे कलाकारांना समृद्धीची प्राप्ती’ : अभिनेते सयाजी शिंदे

पिंपरी: पुढारी वृत्तसेवा :  आजवर विविध भाषेतील सुमारे 500 पेक्षा अधिक चित्रपटात काम केले आहे. प्रेक्षकांना भूमिका आवडली की ते नक्कीच डोक्यावर घेतात. आणि हाच कलाकारांच्या दृष्टीने ड्रीम रोल असतो. असे मत ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. अठराव्या जागतिक मराठी संमेलनातील ‘माझा चित्र प्रवास’ या कार्यक्रमात ते बोलत होते. दिग्दर्शक नागराज मंजुळे, युवा कलाकार आकाश ठोसर, अभिनेते सयाजी शिंदे आणि जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे व्यासपीठावर होते. चित्रपटात साकारलेल्या भूमिकेने कलाकार समृद्ध होत असतो कधी अस्वस्थ होत नाही, असे मत ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.

सुमारे पावणे दोन तासाच्या गप्पांच्या माध्यमातून या कलाकारांनी उपस्थितांबरोबर संवाद साधला. तसेच उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली. रामदास फुटाणे यांनी अधून मधून संवादाची पेरणी केली. सयाजी शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ अभिनेते स्व. निळू फुले यांच्या बरोबर काम करता आले. त्याच्याकडून बरेच काही शिकता आले. याचा नक्कीच आनंद आहे. तेलगू,तामिळ , मराठी, कन्नड अशा विविध भाषेतील चित्रपटात 500 पेक्षा अधिक भूमिका साकारता आल्या आहेत. याचे समाधान आहे. आणि प्रत्येक भाषेतील पहिल्या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला आहे. नागराज मंजुळे यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. काम करीत असताना भाषा ही महत्वाची असते. त्या माध्यामतून रसिकांपर्यंत पोहोचता येते असे ते म्हणाले.

मंजुळे म्हणाले की, चित्रपट क्षेत्रात येईन असं वाटले नव्हते. तसे स्वप्न नव्हते. पण या क्षेत्रात काम करतांना अनेकविध अनुभव आले आहेत. प्रत्येक टीका, प्रेम, ठेच हे बर्‍याच गोष्टी शिकवितात. नेहमी प्रवाहात राहिलो, त्याचा फायदा झाला आहे. चांगला चित्रपट प्रेक्षक पाहतात, त्याचा मनापासुन आनंद घेतात. हेच आपले समाधान आहे. यातून नव निर्मितीची प्रेरणा मिळते. शिंदे यांच्या बरोबर काम करता आले याचे समाधान आहे. फुटाणे यांनी सांगितले की, कलाकार हा नेहमी चांगल्या भूमिकेच्या शोधात असतो. तशी भूमिका मिळाली की आपोआप ती साकारली जाते. शिंदे यांनी तेच केले त्यामुळे ते एकाच भूमिकेत अडकले नाहीत. वाचन संस्कृतीला पर्याय नाही. तसेच प्रत्येक कवितेची भाषा ही कविची स्वतःची असते. हे समजून घेतले पाहिजे. यासाठी हे संमेलन आहे. यावेळी आकाश ठोसर यानेही मनोगत व्यक्त केले.

Back to top button