कळंबोलीत नदीत कार कोसळली; जीवितहानी नाही | पुढारी

कळंबोलीत नदीत कार कोसळली; जीवितहानी नाही

वालचंदनगर (ता. इंदापूर); पुढारी वृत्तसेवा : वालचंदनगर जवळील कळंबोली येथील निरा नदीच्या पुलावरून भरधाव वेगाने निघालेली कार चालकाचा ताबा सुटल्याने पुलावरून नदीपात्रात कोसळली. मात्र, सुदैवाने नदीपात्रात पाणी असल्याने कारमधील दोघेही पाण्यात पोहून बाहेर आले. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी (दि. 3) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

सागर घोडके (वय 28, रा. करमाळा) व सुशांत राजमाने (रा. कळंबोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर) हे दोघे पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वालचंदनगरहून कळंबोलीला कारमधून निघाले होते. कार कळंबोली येथील निरा नदीच्या पुलावरून जात असताना समोरून अचानक भरधाव वेगाने प्रखर लाइट असलेले वाहन आले. समोरील गाडीचा अंदाज न आल्याने कारचालकाचा ताबा सुटून कार पुलाचा कठडा तोडून सुमारे 20 फूट खोल नदीत कोसळली. सुदैवाने नदीत पाणी असल्याने कारमधील दोघेही सुखरूप बाहेर आले. सकाळी कार क्रेनच्या साहाय्याने पाण्याबाहेर काढली. घटनेबाबत वालचंदनगर पोलिस ठाण्यात खबर दिल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी दिली.

Back to top button