महाराष्ट्राने कायम देशाला विचार दिले, आता आपण कुठे फरफटत चाललोय : राज ठाकरे | पुढारी

महाराष्ट्राने कायम देशाला विचार दिले, आता आपण कुठे फरफटत चाललोय : राज ठाकरे

पुढारी ऑनलाईन: प्रत्येकजण राजकारण रोज बघत आहे. सध्या वेगवेगळ्या गोष्टींना फाटे फुटत आहेत. बोलण्याची पद्धत, प्रवक्ते कसे बोलतात ते ऐकूच नाही, पाहुू नाही अशी स्थिती आहे. आजवर महाराष्ट्राने देशाला विचार दिले, हिंद प्रांतावर परकियांनी आक्रमण केले. त्यात इथल्या कुणी राज्य केले असेल ती मराठेशाहीने. राज्यात सध्याची परिस्थिती बघता, आपण कुठे फरफटत चाललो असे परखड भाष्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले. ते पुण्यातील सहजीवन व्याख्यानमालेत बोलत होते.

भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे म्हणाले, प्रत्येक भाषणावेळी माझ्यावर दडपण असते. मला भाषण आणि व्याख्यानामधील फारसा फरक कळत नाही. व्याख्यान सभ्य भाषेत द्यावे लागते एवढाच एक फरक मला वाटतो. आपल्या महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहता थोबाडाला आवरुन बोलावे, अशी समोरच्यांची अपेक्षा असेल, त्याला कदाचित व्याख्यान म्हणत असावे.

पुढे बोलताना माणसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राने देशाला विचार दिले, हिंद प्रांतावर परकियांनी आक्रमण केले. त्यात इथल्या कुणी राज्य केले असेल ती मराठेशाहीने. राज्याची सध्याची परिस्थिती बघता आपण कुठे फरफटत चाललो आहे असे वाटते. या परिस्थितीवर एखादा लेख लिहावा असेही वाटते. 1995 च्या आधीच्या महाराष्ट्रामध्ये शांतता होती. सध्या सर्व काही बदलत आहे. काळ झपाट्याने बदलतोय. बदल मान्य आहे, परंतु तो बदल आपल्या जीवावर उठणारा असेल तर त्या बदलाचे काय करायचे ? राज्याचा 1995 च्या आधीचा काळ बघा. त्या काळात उच्च मध्यम आणि मध्यम वर्गाच्या हाती राजकीय चळवळी होत्या. त्यात धनाढ्य लोक हे श्रीमंत- गरीबातला दुवा होता. त्यानंतर मात्र राजकारणापासून ते वर्ग दुर होत गेले. यातूनच एक मोठा वर्ग राजकारणावर टीका करायला लागला. त्यानंतर राजकारणाचा स्तर खाली जाऊ लागला. महाराष्ट्रात 1995 च्या आधीच्या आणि आताच्या भ्रष्ट्राचारात मोठा फरक आहे, असे ही ठाकरे म्हणाले.

आपल्या अंगी सुज्ञपणा नसेल तर सुशिक्षित असून काही फायदा नाही. वीजेसह आपल्या दैनंदिन गोष्टींचे दर जनता नाही, तर राजकारणी ठरवत आहेत. शाळेत शिकवला जाणारा अभ्यासक्रम सरकार आणि प्रशासन ठरवते. तुम्ही हे सर्व गप्प बसून सहन करता, तुम्ही त्यांना प्रश्न विचारत नाही. या परिस्थितीला अनेक तरुण- तरुणी कंटाळतात आणि विदेशात परदेशात जातात. तुमचे गप्प राहणं, तुमचा सहभाग राजकारणात नसणं, यामुळे आजुबाजूची परिस्थिती, वातावरण खराब होत आहे, असं देखील राज ठाकरे म्हणाले.

Back to top button