नागरिकशास्त्र जास्त गुणांचे असायला हवे; राष्ट्रीय नास्तिक परिषदेत विश्वंभर चौधरी यांचे प्रतिपादन | पुढारी

नागरिकशास्त्र जास्त गुणांचे असायला हवे; राष्ट्रीय नास्तिक परिषदेत विश्वंभर चौधरी यांचे प्रतिपादन

पुणे : वैज्ञानिक स्थायीभाव हे भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य आहे. राज्यघटना कोणत्याही एका धर्माचा किंवा देवाचा पुरस्कार करत नाही. नागरिकांमध्येही वैज्ञानिक स्थायीभाव तयार होण्यासाठी पुतळ्यांवरून हाणामारी करायला लावणारा इतिहास अभ्यासक्रमात शिकवण्यापेक्षा उद्याची पिढी घडवणारे नागरिकशास्त्र 100 गुणांचे असले पाहिजे, याकडे सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी लक्ष वेधले. ब्राइट्स सोसायटीच्या वतीने रविवारी (दि.18) राष्ट्रीय नास्तिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

नास्तिक परिषदेचे हे सहावे वर्ष आहे. गोखले इन्स्टिट्यूटमध्ये पार पडलेल्या या परिषदेमध्ये फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र नायक आणि पत्रकार अलका धूपकर यांचा गौरव करण्यात आला. ’हुम्यानीस्ट्स इंटरनॅशनल’चे उत्तम निरौला, अजित अभ्यंकर, ’विचारवेध’चे आनंद करंदीकर, असीम सरोदे, अविनाश पाटील, शास्त्रज्ञ अनिकेत सुळे, अभिजित चंदा, प्राजक्ता अतुल, जगदीश काबरे, य. ना. वालावलकर, परिषदेचे आयोजक कुमार नागे आदी या वेळी उपस्थित होते.

सरोदे म्हणाले, ’धार्मिक भावना दुखावल्या या कारणाखाली दाखल होणारे अनेक गुन्हे खोटे असतात व पोलिसांनाच न्यायाधीश होऊ देणारी प्रक्रिया बंद झाली पाहिजे. संविधानातील कलम 25 (1) नुसार देव मानण्याचा हक्क आहे तसेच देवही संकल्पना न मानता जगण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. मतस्वातंत्र्याला नाकारणारी नैतिक राखणदारी भारताला मागासलेल्या विचारांचा देश ठेवेल.’

परिषदेतील ठराव
1) कला, साहित्य, प्रकल्प अशा विविध माध्यमांतून बुद्धिप्रामाण्यवाद आणि विवेकवादाला खतपाणी घालणारी आशयनिर्मिती व्हावी
2) मुक्तचिंतक अर्थात ’फ्री थिंकर्स’ना कार्यासाठी प्रोत्साहन देणारी आर्थिक आणि कायदेशीर मदत व्हावी
3) विज्ञानवादी प्रकल्पांमध्ये आणि उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत

Back to top button